
एमआयडीसीसाठी निवेंडी, धामणसेच्या जमिनींवर शासनाचा शिक्का
रत्नागिरी तालुक्यातील औद्योगिक नकाशावर लवकरच मोठे बदल होणार आहेत. शासनाने निवेंडी आणि धामणसे या दोन गावातील जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) साठी संपादित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कलम ३२ (२) अन्वये उपविभागीय अधिकार्यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रक्रियेमुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असली तरी, स्थानिक जमीन मालकांसाठी मात्र आता महत्वाच्या कायदेशीर हालचाली सुरु झाल्या आहेत.
शासकीय अधिसुचनेनुसार निवेंडी गावातील सुमारे १.९२ हेक्टर आणि धामणसे गावातील २.७९ हेक्टर जमिनीवर एमआयडीसीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. यामध्ये निवेंडीतील सर्व्हे नं. ३६, ३७, ४३, ४५, ४५ आणि धामणसेतील सर्व्हे नं. १०५, १६९ मधील जमिनींचा थेट समावेश आहे. भविष्यात भव्य उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा सर्व भूखंड निश्चित करण्यात आला आहे. लवकरच या जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे.www.konkantoday.com




