
समुद्राकडून होणारी धूप रोखण्यासाठी आरे, नेवरे किनार्यावर १३ कोटीचे संरक्षक बंधारे
कोकण किनारपट्टीला सातत्याने बसणारा चक्रीवादळाचा फटका आणि समुद्राच्या उधाणामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने ’कोकण आपत्ती निवारण योजने अंतर्गत मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून रत्नागिरी तालुक्यातील आरे आणि नेवरे या दोन महत्वाच्या किनार्यांवर लवकरच संरक्षक बंधारे उभे राहणार आहेत. येत्या २ दिवसात या कामाचा प्रत्यक्ष श्रीगणेशा होणार आहे. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने या कामाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पत्तन अभियंता विभागाने प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
आरे येथील ८२५ मीटर लांबीच्या धूपप्रतिबंधक बंधार्यासाठी सरकारने ८ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. येथे पत्तन अभियंता विभागाकडून कामाची क्षेत्र निश्चिती आणि आखणी पूर्ण झाली आहे. येत्या २ दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती विभागातून देण्यात आली. त्याचप्रमाणे नेवरे येथील ५२५ मीटर लांबीच्या संरक्षक कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या दोन्ही ठिकाणच्या कामांमुळे किनारपट्टीवरील बागा आणि स्थानिक वस्त्यांना उधाणाच्या धोक्यापासून मोठे संरक्षण मिळणार आहे.
www.konkantoday.com




