
मालगुंड ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री. विलास राणे यांची बिनविरोध निवड
गावातील सर्वसामान्यांना अपेक्षित असणाऱ्या बाबींना प्राधान्य देऊन गावात शांतता व सौहार्दता जपण्यासाठी प्रयत्न करणार विलास राणे यांची ग्वाही
मालगुंड : रत्नागिरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून परिचित असणाऱ्या मालगुंड ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज रोजी ग्रामपंचायत सरपंच सौ. श्वेता शेखर खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
या ग्रामसभेमध्ये सुरुवातीला अजेंड्यावरील विषयानुरूप चर्चा होऊन, मालगुंड गावाच्या विकासकामाच्या दृष्टिकोनातून विविध ठराव घेण्यात आले आणि हे सर्व ठराव लोकांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले.
सभेमध्ये विषयपत्रिकेवरील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्य निवड करणे या विषयांवर चर्चा सुरू झाली असता, रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती तथा माजी सरपंच प्रकाश साळवी यांनी उभे राहून मालगुंड गावचे ग्रामस्थ आणि माजी कृषी अधिकारी श्री. विलास पांडुरंग राणे यांच्या नावाची सूचना करून सर्व ग्रामस्थांनी त्यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. तर याचवेळी मालगुंड गावचे शाखाप्रमुख अतुल पाटील या नावाला अनुमोदन देत मोठी भूमिका बजावली. तसेच मालगुंड गावचे माजी उपसरपंच संतोष चौगुले हेदेखील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र ज्यावेळी कृषी अधिकारी विलास राणे यांचे नाव सर्वानुमते पुढे आल्यानंतर संतोष चौघुले यांनी देखील विलास राणे यांच्यासारखे सर्वसमावेशक व्यक्ती या पदासाठी उभे राहत असतील तर माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करून विलास राणे यांचे कौतुक केले. कारण त्यांनी आपल्या कृषी अधिकारी कार्यकाळात लोकांची सेवा उत्तम प्रकारे केली असून त्यांच्या सारख्या माणसाची निवड होत असल्याने मी माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वच ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरीचे संचालक गजानन पाटील यांनी श्री. संतोष चौगुले यांचे विशेष कौतुक करत नवनियुक्त तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विलास राणे यांचे अभिनंदन केले.
या ग्रामसभेला मालगुंड गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार डॉ. उदय सामंत साहेब, मालगुंड गावचे ग्रामस्थ व रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी यांनीही दूरध्वनीवरून नवनियुक्त तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. विलास पांडुरंग राणे यांच्या अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सदर सभेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रकाश साळवी, जिल्हा बँकेचे संचालक तथा रत्नागिरी तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन उर्फ आबा पाटील, तालुका संघटक रोहित मयेकर, उप तालुकाप्रमुख राजू साळवी, माजी सभापती साधना साळवी, शाखा प्रमुख अतुल पाटील, तसेच मालगुंड गावातील प्रसिद्ध उद्योजक श्री. शेखर खेऊर, उद्योजक श्री. उदय साळवी, उद्योजक विकास साळवी, परेश हळदणकर, त्याचप्रमाणे सरपंच श्वेता खेऊर उपसरपंच स्मिता दुर्गवळी, ग्रामपंचायत सदस्य सन्मान मयेकर, अतुल पाटील, सौ. डांगे, सौ. शुभदा मुळ्ये, प्रीतम मयेकर, शिल्पा पवार, जगन सुर्वे, संजय खेऊर, सौ. गोणबरे, श्री. संतोष चौघुले यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तर जयेंद्र खोत, सुहास पाटील, रामानंद लिमये, दीपक दुर्गवळी, संजय दुर्गवळी, रोहित साळवी, भैय्या साळवी, बंडू साळवी, संतोष साळवी, सौ. सायली साळवी, संदीप देसाई, योगेश साळवी, अनघा तोडणकर, पोलीस पाटील आस्था साळवी, सिद्धी मांडवकर, अमोल राऊत, शशिकांत पवार यांच्यासह इतर मान्यवर, वाडीप्रमुख यासोबतच विलास राणे यांच्या पत्नी विशाखा राणे, सुपुत्र ओंकार राणे, सौ. पूजा राणे यासह त्यांचा कुटुंब परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व उपस्थितांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष विलास राणे यांनी सांगितले की, येत्या काळात गणपती उत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सण – उत्सवात गावामध्ये आनंदी वातावरण राहील आणि त्यासाठी योग्य तो संवाद साधून गावामध्ये शांतता आणि सौहार्दता कायम राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.