
सुरेश कदम यांची लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती
पुणे शहर पोलीस क्राईम ब्रँचसह पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून मागील काही वर्षे यशस्वीरीत्या काम करणारे सुरेश दिनकर कदम यांची नुकतीच पदोन्नती झाली असून, त्यांची रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या बढतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण पोलीस दलात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले सुरेश कदम यांनी १९९५ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे आपले पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चार वर्षे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर त्यांची बदली कोल्हापूर येथे झाली. कोल्हापूरनंतर रत्नागिरी शहर आणि जयगड पोलीस ठाण्यातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक असतानाच जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे ते पहिले अधिकारी ठरले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना लवकरच सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली.
सहायक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी रत्नागिरी वाहतूक शाखा आणि नाटे पोलीस ठाण्यात आपली सेवा दिली. पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील जिल्हा विशेष शाखा, ग्रामीण पोलीस ठाणे येथे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर, राज्यातील गोंदिया येथे तीन वर्षे, पालघर, ठाणे ग्रामीण आणि भोईसर यांसारख्या विविध ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा यशस्वी तपास लावून कायदा-सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गतवर्षीच त्यांना राष्ट्रपती पदक पुरस्काराने गौरवण्यात आले.
ठाणे ग्रामीण पोलीस दलातून त्यांची बदली पुणे क्राईम ब्रँच येथे झाली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना आता उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. शासनाने त्यांची लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी या पदावर नियुक्ती केली आहे. ते लवकरच आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य जनतेशी त्यांचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत. त्यांच्या कार्यामुळे ते नेहमीच जनतेमध्ये लोकप्रिय राहिले आहेत. त्यांच्या या पदोन्नतीमुळे लांजा उपविभागात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, श्री. कदम यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.