विश्व संवाद केंद्राच्या देवर्षी नारद पुरस्कारांचे थाटात वितरण.

रत्नागिरी : ऑपरेशन सिंदूर ही तर एका युद्धाची झलक आहे. यातून आपण काय शिकलो आहे, हे महत्त्वाचे आहे. आधुनिक व बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने आत्मनिर्भर झाले पाहिजे. तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री हे पद योग्य व्यक्तीला दिले पाहिजे जेणेकरून सैनिकी कारवाई करण्यात यश मिळेल. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार धडाडीचे निर्णय घेत आहे. पाककडून दहशतवादी हल्ला झाला तर तो एक युद्धाचा भाग समजला जाणार आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण विजयी झाल्याचा जगात प्रचार केला पाहिजे. यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत भागवत यांनी केले.मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०२५ पुरस्काराचे वितरण शनिवारी रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर प्रमुख अभिजीत हरकरे, पुरस्कार समितीचे संयोजक डॉ. निशीथ भांडारकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक दत्ताजी सोलकर उपस्थित होते.वरिष्ठ पत्रकार अरविंद कोकजे (रत्नागिरी), उल्लेखनीय कार्याबद्दल प्रिंट मीडियातील श्रीराम पुरोहित (कर्जत), इलेक्ट्रॉनिक मीडियातील विजय गावकर (सिंधुदुर्ग) आणि सोशल मीडियासाठी संदेश फडकले यांना देण्यात आला.हेमंत भागवत म्हणाले की, रणनितीच्या दृष्टीने चर्चा आवश्यक आहे. युद्धाकडे भावनेच्या दृष्टीने न बघता अधिक डोळसपणे बघणे गरजेचे पाकिस्तानला ज्या प्रकारे चीनने मदत केली आहे, ती गोष्ट भारताने लक्षात ठेवून त्यांना प्रत्त्युतर देणारी शस्त्रास्त्रे विकसित केली पाहिजेत आणि संरक्षणावर राष्ट्राच्या जीडीपीच्या ३ टक्के खर्च पुढील काही वर्षे केला पाहिजे.

प्रमुख वक्ते अभिजित हरकरे यांनी सांगितले की, हिंदू म्हणून जागतिक पातळीवर आपण आपले योगदान देणं गरजेचे आहे. भारत संपूर्ण जगाकडे वसुधैव कुटम्बकम् या विचाराने पाहतो आहे. भारताने किंवा हिंदूंनी कोणत्याही देशावर आक्रमण करून तिथली संस्कृती संपवली नाही. भारत नेहमीच विश्वबंधुत्वाच्या नजरेने पाहतो. म्हणूनच आपणही एक भारतीय व हिंदू म्हणून आपल्या परंपरेत असणारे मूल्ये व संस्कार जागतिक पटलावर आणणे गरजेचे आहे. यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांची काही उदाहरणे देत हिंदु संस्कृतीचा जागर करण्याचे आवाहन केले.सत्काराला उत्तर देताना अरविंद कोकजे म्हणाले की, नोव्हेंबर 1969 मध्ये बलवंतमधून पत्रकारितेला सुरवात केली. लोकसत्ता, सा. विवेकसाठी काम केले. हा खरा सन्मान स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार सा. बलवंतचा आहे. असे पुरस्कार मिळणे दुर्मिळ असते. मला आतापर्यंत हा तिसरा पुरस्कार मिळाला असून याबद्दल मी शतशः ऋणी आहे. संदेश फडकले यांनी सांगितले की, कोकण संस्कृती यू ट्यूब चॅनेलमार्फत कोकणातील खाद्य, संस्कृती, कृषी, लोककला याची माहिती देतो. हिंदू संस्कृतीचे कोकणात जागर केला जातो. शक्ती- तुरा, नमनातून मनोरंजनासोबत प्रबोधन करतात. आज राष्ट्राच्या हिताची व आपल्या हिंदु संस्कृतीची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे नमूद केले.प्रास्ताविकामध्ये डॉ. भांडारकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार सोहळा भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा व राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला मान्यता देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

पत्रकारिता म्हणजे केवळ माहितीचा वाहक नसून, राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे. सत्य आणि तथ्यावर आधारित पत्रकारिता करणाऱ्या निर्भीड पत्रकारांना प्रोत्साहन देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे देवर्षी नारद पत्रकार सन्मान आहे. यंदा या पुरस्कारांचे रौप्य महोत्सवी वर्ष असून दरवर्षी येथे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आहे.विभाग रा. स्व. संघ सहकार्यवाह डॉ. प्रफुल्ल सप्रे, राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत सहकार्यवाहिका उमाताई दांडेकर, रायगड रा. स्व. संघ विभाग कार्यवाह विजय सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा रा. स्व. संघचालक अरविंद कुडतरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. देवर्षी नारद पुरस्कार निवड समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर व सुकांत चक्रदेव यांनाही सन्मानित करण्यात आले. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर यांनी आभार मानले. भूषण शितूत यांनी म्हटलेल्या पसायदानाने सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button