
तक्रार निवारण्यासाठी विशेष उपाययोजना, नगर परिषदांच्या तक्रारींचा २१ दिवसात निपटारा.
राज्य सरकारने जनतेच्या तक्रारी निवारण करण्यासाठी विशेष स्वरुपाची उपाययोजना लागू केली आहे. नगर परिषदांच्या संदर्भातील तक्रारी सोडवण्यासाठी मुख्याधिकार्यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.सामान्य जनतेच्या विविध प्रकारच्या तक्रारी शासकीय व्यवस्थेच्या विरोधात असतात. त्यांचा निपटारा होत नाही, अशाही तक्रारी येत असतात. महिनोंमहिने तक्रारी पडून आहेत, असे गार्हाणे शासन स्तरावर मांडले गेल्याने आता नगर विकास विभागाने एक शासन निर्णय जारी केला आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, प्राप्त झालेल्या तक्रारींचा समन्वय नोडल अधिकारी करतील. विविध शाखांचे अधिकारी या नोडल अधिकार्याला मदत करतील. सर्वसाधारणपणे तक्रार प्राप्त झाल्यावर २१ कार्यालयीन दिवसात निराकरण करणे आवश्यक आहे. या कालावधीत तक्रार निवारण न झाल्यास संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडे विचारणा केली जाऊ शकेल. समाधान न झाल्यास मुख्याधिकारी प्रलंबित तक्रारींविषयी विचारणा करू शकतील. एका विभागाकडून दुसर्या विभागाकडे तक्रार हस्तांतरित करायची असल्यास ती प्राप्त झाल्यानंतर ५ कार्यालयीन दिवसात ऑनलाईन हस्तांतरित करण्यात यावी.या तक्रारीचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी आढावा बैठक घ्यावी तसेच तक्रार निराकरणाबाबत अर्जदाराला अवगत करावे. विभागीय स्तरावरील पर्यवेक्षिय अधिकारी यांच्या अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात यावा, असे शासनाने म्हटले आहे.www.konkantoday.com