
स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर टीका-अॅड. दीपक पटवर्धन
विकासाभिमुख समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार्या, काम करणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना नव्हे टीका करतानासुद्धा विवेकाने बोलावे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात किती उद्योग आले, तरुणांना रोजगार मिळाला? याबाबत लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करावे. आपली अकार्यक्षमता दडवून सवंग लोकप्रियतेसाठी स्वच्छ, कार्यक्षम, धैर्यशील मुख्यमंत्र्यावर उथळ टीका करू नका, असे ठाम प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.श्री. फडणवीस हे दलालाच्या दबावाखाली आले, असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांवर टीका वाचनात आली. त्या अनुषंगाने अॅड. पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी काम करताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून कार्यक्षमपणे कार्यरत असलेल्या व जनमानसात स्वच्छ प्रतिमा आणि आदर असलेल्या फडणवीस यांच्यावर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी टीका करताना लोकप्रतिनिधीनींनी संयम ठेवणे अपेक्षित आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी व्हायचे त्यांच्यावरच अर्वाच्च भाषेत टीका करायची आणि आव्हान द्यायचे हे जनतेला पटणारे नाही.मुख्यमंत्र्यांनी सुरवातीपासूनच प्रकल्पाबाबतचे गैरसमज दूर करून प्रकल्प होऊ देण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. 17 सप्टेंबरला प्रकल्प समर्थक मुख्यमत्र्यांना सामोरे आल्यानंतर येथील जनतेला प्रकल्प हवा असेल तर फेरविचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित करणे हे समयोचित होते.गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती उद्योग कार्यरत झाले, येथील युवकांच्या भविष्यासाठी काय केले, याबाबत लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करावे. लोकांच्या भावना भडकवून त्यावर स्वार होऊन राजकीय हित साधण्याचा संकुचित स्वभाव बदलून या जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणासाठी प्रयत्न करणे, हजारो एकर पडीक कातळ जमिनी विकसित करण्यासाठी शासनाकडे नव्या योजना मांडून पाठपुरावा करण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करावे. क्षणिक सवंग लोकप्रियतेसाठी स्वच्छ, कार्यक्षम, धैर्यशील मुख्यमंत्र्यावर उथळ टीका करून आपली अकार्यक्षमता दडवू नये, अशी स्पष्टोक्ती अॅड. पटवर्धन यांनी केली.
www.konkantoday.com