
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं
हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता
रविवारी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं आहे. यामुळे रत्नागिरीतील अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडलं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. खेडच्या मटण मार्केट परिसरात पुराचं पाणी शिरलं संगमेश्वरमध्येही पावसाने हाहाकार उडाला आहे. शास्त्री आणि सोनवी नद्यांना पूर आला असून धामणी, संगमेश्वर इथं पूरस्थिती निर्माण झालीय. मुंबई गोवा महामार्गावर श्रद्धा हॉटेलला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय. नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यानं हॉटेल्स आणि लॉजमध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे हॉटेलच्या लोकांचे मोठे नुकसान झाले आहे संगमेश्वरमधील गोळावली इथं सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास दरड कोसळली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
राजापूरमध्येही पुराचा फटका बसला आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचं पाणी शिरलं आहे. रत्नागिरी शहर परिसरात मात्र पावसाने सकाळपासून काहीशी विश्रांती घेतली होती