
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयात सर्वात निचांकी भरती.
राज्यभरातील एकाही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात १०० टक्के अध्यापक आकृतिबंध नसल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समिती अर्थात लोकल इन्क्वायरी कमिटीने (एलआयसी) याबाबतचा अहवाल सादर केला असून, राज्यातील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मंजूर क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी अध्यापक असल्याचे निदर्शनास आले आहे. रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयात सर्वात निचांकी भरती झाली असून, सर्वाधिक कमी प्राध्यापक असलेले रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील एकमेव आहे. शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग अध्यापकांची ४२ टक्के पदे भरली आहेत.सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यापिठाच्या एलआयसी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्यभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यात अनेक मुद्दे समोर आले असून, राज्यातील २५ पैकी एकाही महाविद्यालयात प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर व असिस्टंट प्रोफेसर या पदांची १०० टक्के भरती झालेली नसल्याचे दिसून आले आहे.www.konkantoday.com