निसर्गसंपन्न वृध्दाश्रमात वृध्दांचे आयुष्य वाढेलवयस्करांच्या समस्यांसाठी उपाययोजना कराव्या लागतील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


*रत्नागिरी,:- निसर्गसंपन्न असणाऱ्या वृध्दाश्रमात येणाऱ्या वृध्दांचे पाच दहा वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या करता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथील मिलन वृध्दाश्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॕड आशिष शेलार, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार भाई जगताप, सूर्यकांत दळवी, डाॕ विनय नातू, डाॕ जलिल परकार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आनंदही व्हावा आणि खंत वाटावी अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात. आनंद याकरिता की डॉक्टर जलिल परकार यांनी अतिशय सुंदर, महाराष्ट्रातील कदाचित पहिल्या चार-पाच वृद्धाश्रमात ज्याची आपण गणना करू शकतो, असा वृद्धाश्रम या ठिकाणी तयार केला. त्याचा अतिशय मनापासून आनंद आहे आणि खंत याची की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले, अडचणी वाढल्या. काही प्रमाणात कौटुंबिक ओलावा देखील कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज पडायला लागली.
भारतामध्ये परिवार संस्कृती चांगली होती. भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती. परंतु, जेव्हा समाजात एखादे आव्हान उभं राहतं, त्यावेळी त्या आव्हानाचा सामना करण्याकरिता समाजातील कोणीतरी पुढे येतं आणि अशाच प्रकारे डॉक्टर जलिल परकार पुढे आले आणि त्यांनी ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली आहे.
पुढच्या वीस वर्षांत आपलं सरासरी वय हे ८५ वर्ष होणार आहे. २०३५ नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या करता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यमंत्री श्री कदम म्हणाले, वृध्दाश्रमामध्ये जे वृध्द येतात त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड वेदना होतात. आमच्याकडे जे वृद्धाश्रम आहेत, तिथे आजही जवळपास ४८ पेक्षाही जास्त वृध्द आहेत. काही वेळेला इतकी वाईट परिस्थिती होते की जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तेव्हा अग्नि द्यायला देखील कुटुंबातील कोणी येत नाही. डॉक्टर जलिल परकार यांनी वृद्धाश्रम माझ्या मतदारसंघांमध्ये सुरु करुन वृद्धांना आधार दिलेला आहे.
खासदार श्री. तटकरे म्हणाले, डॉ. परकार यांनी मिलन वृद्धाश्रमाच्या उत्तम पद्धतीने उभारण्यात आलेल्या सगळ्या रूम पाहून येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना या सगळ्या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्या हक्काच्या घरामध्ये आल्यासारखे वाटेल. प्रदूषणविरहीत निसर्गरम्य वातावरण अतिशय उत्तम पद्धतीने कोकणी पद्धतीने लावलेली सगळी झाडे त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचे आयुष्य वाढेल.
डाॕ परकार यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button