
९० दिवसाची मासेमारी बंदी बंधनकारक करण्याची मागणी
सध्या मत्स्य व्यवसायात कमालीची घट दिसून आली आहे. हवामान बदलासह अपरिमित मासेमारी, बेसुमार लहान आकारमानांच्या माशांची मासेमारी, पर्ससीन, ट्रॉलर्स, एलईडी मासेमारी, परकीय मच्छीमारांची घुसखोरी, समुद्री प्रदूषण, समुद्री परिसंस्थेवर झालेला परिणाम, प्रजनाच्या पोषक वातावरणाअभावी मत्स्य साठ्यांचे होणारे स्थलांतर आदी कारणांमुळे मत्स्यउत्पन्न घटक चालले आहे.मत्स्य उत्पन्न घटल्यामुळे मत्स्य सहकार क्षेत्रावर संकटाचा डोंगर समोर आहे. या क्षेत्रावर असलेल्या रोजगाराच्या साखळी- वरही मोठा परिणाम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावसाळ्याच्या मासेमारी बंदीचा कालावधी ९० दिवसाचा केल्यास शाश्वत मासेमारी आशादायी ठरणार असल्याचे मच्छीमारांकडून अधोरेखित केले जात आहे. तर राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून जून ते ऑगस्ट अशी ६० दिवसाची मासेमारी बंदी कालावधी जाहीर केला जातो.या कालावधीत समुद्रात विपुल प्रमाणात माशांचे प्रजनन होते. यामुळे मत्स्य साठ्यामध्ये वाढ होत असली तरी अलीकडच्या काळात ही वाढ कमी असल्याचे सांगितले जाते. मत्स्य प्रजननाचा कालावधी वाढवल्यास मत्स्य साठ्यांमध्ये भरघोस वाढ होणार असल्याचे मत मच्छीमारांचे आहे.एकीकडे राज्य शासनाने ६० दिवसांच्या मासेमारीचा कालावधी जाहीर केला असताना दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी मच्छीमार समाज व संघटनांनी गतवर्षी स्वघोषित ९० दिवसाची मासेमारी बंदी केल्यामुळे व त्याची अंमलबजावणी केल्यामुळे मत्स्य उत्पादनात गेल्यावर्षी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे ९० दिवसाची मासेमारी बंदी बंधनकारक करण्याची मागणी या निमित्ताने मच्छीमार संघटना करत आहेत.