
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र 24X7 कार्यरत ठेवण्याचे एनडीएमएचे निर्देश.
रत्नागिरी, दि. 9 :- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत सध्या देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र (ईओसी) 24X7 कार्यरत ठेवावेत. निर्देश देण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
सर्व विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र (ईओसी) 24X7 कार्यरत ठेवावेत. कक्षात पोलीस/होमगार्डसच्या प्रशिक्षित नियुक्ती करावी. तसेच आवश्यकता असल्यास एनसीसी, एनएसएस, नेहरु युवा केंद्र स्वयंसेवक, आपदा मित्र यांची नेमणूक करावी व त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व सैन्य दलांशी सतत समन्वय ठेवावा. या प्रतिसाद दलांशी दररोज संवाद साधावा. जिल्ह्यांमध्ये रेशन आणि औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा. कोणतीही अनावश्यक साठेबाजी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. जिल्ह्याच्या अधिकृत संचार माध्यमांद्वारे आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि अफवांना प्रतिबंध करावा. नागरिकांना अधिकृत संचार माध्यमांबद्दल जागरुक करावे. कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास ती नोंदवून त्यावर उपाययोजना करावी. आवश्यक असल्यास, जिल्ह्यासाठी सुरक्षित स्थलांतराची योजना तयार करावी. स्थलांतरित लोकांसाठी सुरक्षित निवारा केंद्रे निश्चित करावी व सदर निवारा केंद्रे सुरक्षित ठिकाणी असल्याची खात्री करावी. या निवारा केंद्रापर्यत पुरेसे अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आवश्यक असलेल्या ठिकाणी सायरन खरेदी करून स्थापित करावेत.
जिल्ह्यात कोणतेही सैन्याचे सामान (उदा., गोळाबारीचे अवशेष) पडलेले आढळल्यास, नागरिकांनी ते स्पर्श करू नये याबद्दल तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष व पोलीस नियंत्रण कक्षास कळवावी.