
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूरपासून माणगावपर्यंतच्या प्रवास चाकरमान्यांसाठी ठरतेय वाहतुकीची कोंडी.
उन्हाळी सुट्टीसाठी गावी येणार्या चाकरमान्यांसह कोकण व गोव्याच्या दिशेने जाणार्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. चाकरमानी व पर्यटकांच्या मार्गात वाहतूक कोंडीचा ’स्पीडब्रेकर’ उभा ठाकला आहे. चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे मनस्ताप कायम असतानाच इंदापूरपासून माणगावपर्यंतच्या प्रवासात वाहनचालकांची ’कोंडी’च होत आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त होत असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसत आहे. अपघातांच्या दृष्टीने शापित बनलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या १६ वर्षांपासून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनासह इतर तांत्रिक अडचणींमुळे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे सणांच्या कालावधीसह सुट्टयांच्या हंगामातही मनस्ताप कायमच राहिला आहे.
विशेषतः इंदापूर ते माणगाव-टेमपाले गावापर्यंत सुरू असलेल्या रस्ता कामामुळे वाहतूक कोंडी ऐरणीवर आली आहे. माणगाव शहराच्या बाहेरून नेला जाणारा महामार्ग तांत्रिक अडचणींमुळे धूळखात पडला आहे. याचमुळे माणगाव येथे मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून मार्गस्थ होणार्या वाहनचालकांना तासन्तास तिष्ठत थांबावे लागत आहे. इंदापूर ते माणगावपर्यंतच्या प्रवासातील वाहतूक कोंडीचा तिढा कायम असल्याने वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. www.konkantoday.com