
“पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केल्यामुळेच लहारोमधील रडार उद्ध्वस्त”, परराष्ट्र मंत्रालयाने मांडली भूमिका!
२२ एप्रिल* रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारताकडून करण्यात येतोय. दरम्यान, आजही भारत आणि पाकिस्तानाने एकमेकांवर हल्ले केले. हे हल्ले पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. आजही सुरक्षा दलाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सौफिया कुरेशी यांनी आजच्या दिवसभराची माहिती दिली.पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं.”७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या पत्रकार परिषदेत भारताने आपला प्रतिसाद केंद्रित, संतुलित आणि गैर उत्तेजक असल्याचं म्हटलं होतं.
तसंच, यावेळी पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. पण भारतातील लष्करावर कारवाई झाल्यास योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा देण्यात आला होता”, असा पुनरुच्चार व्योमिका सिंग यांनी केला.”७-८ मे च्या रात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू , पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना , आदमपूर, भटिंडा , चंदीगड , नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने हे लक्ष्य निष्क्रिय केले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत जे पाकिस्तानी हल्ल्यांचे पुरावे आहेत”, असं सुरक्षा दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं.