
रत्नागिरी जिल्ह्यात ७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र.
रत्नागिरी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभाथ्यांची छाननी सुरू झाली असून छाननीमध्ये जिल्ह्यातील ७ हजार ७५३ बहिणी अपात्र ठरल्या आहेत. या योजनेत अनेक अटी होत्या. त्यांचे उल्लंघन करून ज्यांनी अन्य योजनेचा लाभघेतला अशा एक-दोन नव्हे, तर ७ हजार ७५३ लाडक्या बहिणी जिल्ह्यात आढळल्या. त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. काही बहिणी अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनाही वगळले.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेणाऱ्या २ हजार ७६२ महिला आढळल्या. चारचाकी असलेल्या १ हजार ३५० बहिणी आढळल्या. ६५ वर्षांवरील १ हजार ३८७ बहिणी लाभ घेताना आढळल्या. अनेक नव्या शेतकरी योजनांच्या लाभार्थी २ हजार २५४ लाभार्थी महिला आढळल्या. एकूण जिल्ह्यात ७ हजार ७५३ बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यांना आता लाभ मिळणार नाही. उर्वरित बहिणींना आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागेल. ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत हे कार्ड लिंक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.