
रत्नागिरी शहरात उनाड कुत्री आणि गुरांमुळे वाढले अपघातांचे प्रमाण.
रत्नागिरी: रत्नागिरी शहरात सध्या उनाड गुरे आणि कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे. या जनावरांच्या रस्त्यांवरील वावरमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडून या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र दिसत आहे.शहरातील सन्मित्र नगर भागात तर या उनाड गुरांचा विशेष त्रास आहे. या भागात रोज रात्रीच्या वेळी रस्त्यांवर कळपच्या कळप फिरत असल्याने अपघाताची शक्यता नेहमीच असते.
गुरुवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास याच भागातील रहिवासी आश्रफ मस्कर हे आपले काम संपवून दुचाकीवरून घरी जात असताना एका याच गुरांच्या शेणामुळे त्यांची दुचाकी घसरली आणि ते गंभीर जखमी झाले.या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “शहरे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना, रस्त्यांवर उनाड गुरांमुळे अपघात होत असतील, तर याला जबाबदार कोण?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.