
उद्धव ठाकरे – राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी नवी मोहीम.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावे’, अशा आशयाचे बॅनर्स शिवसेना भवनसमोर लावण्यात आले आहेत. दरम्यान, आता ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी ‘बंधू मिलन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या नवीन मोहीमेची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. गुढी पाडव्या दिवशी मोहनिश राऊळ यांनी ‘बंधू मिलन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर ठेवली आहे. या कार्यक्रमाचे आयोजनही स्मृतीस्थळावरच करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला येण्यासाठी दोन्ही ठाकरेंना विनंती केली जाणार आहे. यामुळे आता या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणुकही होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची मागणी समाजमाध्यमावर होत आहे.