रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद टोकाला पोहोचला, शिंदे गटाच्या आमदाराकडून सुनील तटकरें यांच्यावर जोरदार टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती.तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतोआणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेट खेळाचे उदाहरणे आम्हाला देऊ नका.

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असे महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना सुनावले.आज पंचांनी निर्णय जरी दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे.मात्र थर्ड अंपायरने हा पालकमंत्री पदाचा निर्णय चुकीचा होता म्हणून आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देऊ शकलो. कर्णधाराने सर्व सहकाऱ्यांना सामावून घेतले पाहिजे.आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेलात, अशी टीकाही थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केली.

राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. परंतु पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील, असे थोरवे यांनी म्हटले. ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाचा दाखल देत सुनील तटकरे यांना थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली. ‘आमचा औरंगजेब हा सुतार वाडीत बसलाय’, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या टीकेला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देणार, हे बघावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button