
मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी , अधिकारी, मंत्र्यांचे परदेश दौरेही कमी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वच जनतेला सध्या काटकसरीने वागण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील पैसा परदेशात जाऊ नये म्हणून त्यांनी जनतेला वेगवेगळे आवाहन केले आहे.वर्षभर सोन्याची खरेदी न करणे, परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग न करणे, इंधनाचा जपून वापर करणे अशा काही आवाहनांचा यात समावेश आहे. दरम्यान, मोदींच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी आपले परदेशी दौरे रद्द केले आहेत. खुद्द मोदी यांनीदेखील आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत, असे सांगितले जातेय. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांसाठी लागू असेल.
…तर थट्टा-मस्करी तरी करू नका
मुंबईत असताना फडणवीस यांनी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनावर भूमिका व्यक्त केली. विरोधक मोदी यांनी केलेल्या आवाहनाला विरोध करत आहेत. या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा नसेल तर निदान निंदा करू नये, असे फडणवीस म्हणाले. तसेच देशासमोर संकट निर्माण होऊ नये म्हणून पंतप्रधान काही उपाय सुचवत असतील तर विरोधकांना त्याची अंमलबजावणी नसेल करता येत तर त्या उपायांची थट्टा मस्करी करु नका, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.
फडणवीस यांनी नेमका काय निर्णय घेतला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन जपून वापरण्याच्या दिल्ल्याचे आम्ही पालन करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या जाती. अधिकारी, मंत्र्यांचे परदेश दौरेही कमी केले जातील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. तसेच मोदी यांनी आपल्याला सहा महिने मागितले आहेत. त्यामुळे ही मुदत न देणे योग्य होणार नाही, असेही मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
तसेच फडणवीस यांनी जनता मोदी यांच्या आवाहनाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देईल, असा विश्वास व्यक्त केला. देशात तयार झालेल्या वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.




