
*चिपळूणशहरातील नलावडा बंधारा पुरसंरक्षक भिंतीसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर!**आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश*
__चिपळूण (प्रतिनिधी):– शहरातील शंकरवाडी-मुरादपूर वाशिष्ठी नदी तीरावरील नलावडा बंधारा वाहून गेल्याने या परिसरात पूरस्थिती निर्माण होऊन येथील नागरिकांचे नुकसान होत होते. यामुळे नलावडा बंधारा येथे पूर संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. याची दखल घेऊन आमदार शेखर निकम यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठवा केल्यामुळे नलावडा बंधारा येथे पूर संरक्षक भिंतीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे शंकरवाडी- मुरादपूर परिसर पूरमुक्त होण्यास मदत होणार आहे. या निधीसाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीने विशेष सहकार्य केल्याने त्यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत.चिपळूण शहरामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. सदरचे ठिकाण वाशिष्ठी नदीवरील मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाच्या खालील बाजूस अंदाजे १ कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी वाशिष्ठी नदीच्या पात्रास वळण तयार झालेले आहे. नदीच्या वळणाचे आतील बाजूस गाळ व वाळू साठलेली असून वळणाच्या बाहेरील बाजू दरवर्षी पुराच्या पाण्याने खचत चाललेली आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडा बंधारा) जूने दगडी बांधकाम पूर्वी करण्यात आलेले होते. परंतु, चिपळूण शहरामध्ये उद्भवलेल्या दि.२२ व २३ जुलै २०२१ च्या पूर परिस्थितीमध्ये बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेलेले आहे. त्यामुळे शंकरवाडी, गोसावीवाडी व भोईवाडी या आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. तसेच, घरांना धोकादेखील निर्माण झालेला आहे.नदीपात्रामध्ये या ठिकाणी वळण असल्याने अतिवृष्टी कालावधी मध्ये पुराचे येणारे पाणी नदीच्या वळणाप्रमाणे नदीपात्रात न जाता, वेगाने थेट शंकरवाडी, गोसावीवाडी यामधील कमी उंचीच्या सखल भागात जात आहे. पुरामुळे नदीच्या पाण्याला वेग असल्याने व त्या वळण्याच्या बाहेरील बाजूची संरक्षक भिंत पुराने वाहून गेली असल्यामुळे माती खचत चालली आहे. त्यामुळे अतिवृष्टी कालावधीमध्ये पुराचे पाणी चिपळूण शहरात मोठया प्रमाणात प्रवेश करत असल्याचे पुराच्या वेळी समोर आलेले आहे. यामुळे येथील नागरिकांचे देखील नुकसान झाले असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.यामुळे शंकरवाडी, गोसावीवाडी या मधील उच्चतम भागामध्ये पूर्वी असलेली संरक्षक भिंतीलगत सदर भिंतीचे बांधकाम केल्यास नदीच्या पुराचे पाणी गोसावीवाडीच्या विरुद्ध दिशेला नदीच्या काठावर सपाट जमीन असल्याने त्या भागात पसरण्यास मदत होईल व त्या बाजूकडील भागामध्ये लोकवस्ती व घरे (वालोपे व कळंबस्ते गावाचा भाग) नसल्यामूळे त्याठिकाणी नुकसानीचा धोका नाही.शंकरवाडी येथून वाशिष्ठी नदीचे पाणी चिपळूण शहरामध्ये सांस्कृतिक केंद्र, स्मशान शेड, वाणी आळी मार्गे शिव नदीला मिळते. सदरचे पाणी शंकरवाडी येथे अडवल्यास शंकरवाडी, गोसावीवाडी, भोईवाडी या तीन्ही वाडीतील घरांना धोका पोहचणार नाही. तसेच वाशिष्ठी नदीचे पाणी शिवनदीकडे जाताना आजूबाजूला पसरल्याने शहरातील जी पाण्याची पातळी वाढते त्यास अटकाव होईल. सदरचा बंधारा बांधणे करीता आमदार शेखर निकम यांनी नवीन पूरसंरक्षक भिंतीसाठी निधी मिळावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला.यानुसार चिपळूण शहरातील शंकरवाडी-मुरादपूर, येथील वाशिष्ठी नदी तीरावरील नलावडा बंधारा येथे पूर सरंक्षक भिंत बांधणेच्या ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रक तयार केले. यानुसार चिपळूण शहरातील शंकरवाडी-मुरादपूर येथील वाशिष्ठी नदी तीरावरील नलावडा बंधारा येथे पूर सरंक्षक भिंत बांधकामाच्या प्रस्तावास नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत चिपळूण शहरातील शंकरवाडी- मुरादपूर येथील वाशिष्ठी नदी तीरावरील नलावडा बंधारा येथे पूर सरंक्षक भिंत बांधकामाच्या प्रस्तावास प्रस्तावित पूर संरक्षक भिंत बांधण्याच्या कामासाठी शासनाकडून वीस कोटी एकवीस लक्ष एकोणीस हजार तीनशे एक रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आमदार शेखर निकम यांचे विशेष प्रयत्नांना यश आल्याने येथील परिसर मुक्त होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांचा हा प्रश्न मार्गी लागल्याने येथील नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.www.konkantoday.com