महाबळेश्वर-पाचगणीमध्ये पर्यटन थंडावले; 2024 मध्ये पर्यटकांची संख्या थेट निम्म्यावर, पर्यटकांची कोकणला पसंती
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर-पाचगणीची ओळख असून वर्षाकाठी महाबळेश्वरला १८ ते २० लाख पर्यटक भेटी देत असतात.ही संख्या हळूहळू रोडावत असून अवघ्या साडेआठ लाखांवर यावर्षी ही संख्या आली आहे. पर्यटकांची पसंती ही कोकणाकडील पर्यटन स्थळांना वाढू लागल्याने ही संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. दरवर्षी उन्हाळी पावसाळी हंगामांसह दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वर -पाचगणी पर्यटकांनी बहरलेले पाहायला मिळते. नगरपरिषदेकडील नोंदणी नुसार कोरोना प्रादुर्भावापूर्वी (२०२० पर्यंत) येथे १८ ते २० लाख पर्यटक येत होते.
पुढील दोन वर्षात पर्यटनावर मर्यादा होत्या. कोरोना पश्चात २०२३ मध्ये महाबळेश्वरला १६ लाख २४ हजार २१७ पर्यटकांनी भेटी दिल्या. पूर्वीच्या तुलनेत ही घट चार लाखांची होती. नुकत्याच संपलेल्या २०२४ मध्ये आणखी घट होत हा आकडा ८ लाख ४८ हजार ५५५ वर आला आहे.पर्यटकांची संख्या कमी होण्याची कारणे गेल्या काही वर्षात निवास हॉटेलसह विविध सुविधांच्या दरात महाबळेश्वर-पाचगणीत मोठी वाढ झाली आहे. येथे फिरताना विविध प्रकारचे स्थानिक करही पर्यटकांना अधिक प्रमाणात द्यावे लागतात. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या कोकणातील पर्यटन स्थळांना आता अधिक पसंती मिळू लागली आहे. पर्यटन स्थळांमध्ये नाविन्यता नसणे, छोट्या रस्त्यांमुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी, ही देखील पर्यटकांनी पाठ फिरवण्याची कारणे आहेत .येथील पर्यटन व्यवसायासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.