
गेल्या काही दिवसांमध्ये खेड तालुक्यात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होवू लागल्याने निसर्गसंपदेचा ऱ्हास
खेड : गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होवू लागली असल्याने निसर्गसंपदेचा ऱ्हास होवू लागला आहे. दोन दिवसांपुर्वी भोस्ते आणि कशेडी या दोन ठिकाणी डोंगरांना लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतीसह जनावरांच्या कडब्याची राख झाली आहे. जंगलात लागणारे वणवे लागतात की लावले जातात याबाबत वेगवेगळे तर्कविर्तक
असल्याने वणव्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
उन्हाळा सुरु झाला की रानात वणवे लागायला सुरवात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलसंपदा जळून खाक होते. काही ठिकाणी जनावरांचे गोठे, गोठ्यातील जनावरे, आंबा काजूची कलमे जळून खाक होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते मात्र वणव्यात होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने वणव्याचे बळी ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानिला सामोरे जावे लागते.
पुर्वी महामार्गालतगच्या डोंगराना मोठे वणवे लागत असत. यामध्ये आंबा-काजूच्या बागा, जनावरांची वैरण, आईन, किंजळ, साग, यासारखी झाडे जळून जात असत. महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचे चालक सिगरेट किंवा बिडी शिलगावून माचीसची पेटती काडी रस्त्याच्या कडेला टाकत हे प्रामुख्याने वणव्याचे कारण असे मात्र आता जंगलात कुठेही वणवे लागू लागले आहे. दोन दिवसांपुर्वी भोस्ते आणि
कशेडी या गावांच्या हद्दीत लागलेल्या वणव्यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे. शिवाय जंगली प्राणी, पक्षी यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका पोहचला आहे.
हे दोन्ही ठिकाणचे वणवे कसे लागले याचे कारण अद्याप कळले नाही. कळेल असेही वाटत नाही. वनविभागाला याबाबत काहीही देणे- घेणे नाही, वणव्याच्या कारणांबाबत वनपालांना विचारले असता ज्या जंगलामध्ये वणवा लागला ते जंगल वनविभागाच्या ताब्यात नाही त्यामुळे वणवा कसा लागला हे माहीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जंगलात लागणारे वणवे, आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कुणाला धरायचे? या प्रश्न निर्माण होत आहे.
www.konkantoday.com