
साखरेची पोती उतरवताना कामगाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
जयगड येथील आंग्रे पोर्ट येथील घटना, चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : साखरेची पोती मालवाहू ट्रकमधून उतरवत असताना मागच्या चाकाखाली चिरडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जयगड येथील आंग्रे पोर्टजवळ घडली.
सोमवार 17 जानेवारी रोजी सकाळी 5 वा. ही घटना घडली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याने चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाकर भूषण पासवान (वय 45, मूळ रा. बिहार, सध्या रा. आंग्रे पोर्ट, सांडेलावगण, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी लोडर चालक सनोज कुमार विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात मयत कामगाराचा मुलगा दिलखुष दिवाकर पासवान (वय 18, मूळ रा.बिहार, सध्या रा. आंग्रे पोर्ट, सांडेलावगण, रत्नागिरी ) याने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार रमेश गावित करत आहेत.