गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा मुंबई गोवा महामार्ग फक्त अवजड वाहनांना आज मध्यरात्रीपासून बंद.
गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजन क्षमता असणार्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई केली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी फक्त अवजड वाहनांना या मार्गावरुन वाहतूक करता येण्यास मज्जाव केला आहे. अवजड वाहनांना बंदी घातली असताना दुसरीकडे मात्र रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असल्याने गणेशभक्तांचा प्रवास खडतर असणार आहे.जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्या वाहनांना यातून सरकारने सूट दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मुंबई सावंतवाडीदरम्यान जड वाहनांनाबंदी असणार आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास म्हणून ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे. तर ५ व ७ दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ पासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्री ११, तर अनंत चतुर्दशी परतीच्या प्रवासाकरिता १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ या कालावधीत बंदी राहील. या महामार्गावर बंदी कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना ८ सप्टेंबर रात्री ११ वाजेपासून ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीस परवानगी राहील.