
45 किमी ताशी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला, असे सांगणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत-आमदार भास्कर जाधव
. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर उभ्या जगाचे स्वाभिमान आहेत. त्यांनी केलेल्या राज्य कारभारावर जगाच्या पातळीवर अभ्यास होतो आहे. महाराजांचा पुतळा अशा अवस्थेत पाहताना मनाला प्रचंड वेदना होत आहेत.याठिकाणी असणाऱ्या बुरुजावरील दगड हा नुसता नाममात्र ठेवला आहे त्याला जरा धक्का लागला तरी पडतो आहे. 45 किमी ताशी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला, असे सांगणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. यापूर्वी राम मंदिर, काश्मीरचा प्रश्न निवडणुकीचा एटीएम कार्ड म्हणून वापरण्यात आले आणि आता छ. शिवाजी महाराजांचा पुतळा निवडणुकीसाठी एटीएम कार्ड म्हणून कसं वापरले गेलं त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. छ. शिवाजी महाराजांचा मतांसाठी उपयोग करुन घेण्याच्या उद्देशाने पुतळा उभारला होता. पुतळ्याचे काम नवख्या लोकांना का दिले ? भ्रष्टाचारासाठी छत्रपतींचे नाव वापरण्याचे काम या ठिकाणी केले आहे, अशा लोकांचा राजकीय क्षितीजावरुन कडेलोट करायला पाहिजे, असे जाधव म्हणाले. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची पाहणी करण्यासाठी आज जाधव आले होते.