
अणुस्कुराघाटाचे सर्व्हेक्षण करण्याची गरज.
रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा ‘शॉर्टकट’ मार्ग म्हणून ओळखला जातो; मात्र अणुस्कुरा घाटात गेल्या काही वर्षामध्ये पावसाळ्यात दरडी आणि माती कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.यावर्षी दोनवेळा दरड कोसळली. त्यामुळे हा मार्ग प्रवासाच्यादृष्टीने धोकादायक ठरत आहे. धोकादायक दरडी, अरूंद अन् धोकादायक वळणे, भूस्खलन, संरक्षण कठड्यांची आवश्यकता आदींच्या अनुषंगाने घाटाचे सर्व्हेक्षण करण्याची गरज आहे तसेच घाटरस्ता रूंदीकरणासह अन्य उपाययोजना करण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी केली आहे. तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचेही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित केले आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकणचे नूतन मुख्य अभियंता मिलिंद कुलकर्णी यांची आमदार साळवी यांनी भेट घेतली. या वेळी अणुस्कुरा घाटामध्ये करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चाही केली.