रत्नागिरी शहरातील नव्या पाणी योजनेची चौकशी करा- माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची मागणी


रत्नागिरी नगरपालिकेच्या सुधारित नळपाणी योजनेचे काम 2016 ते 2019 या कालावधीत पूर्ण होणे गरजेचे होते. पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील ठेकेदार नेमण्याचे काम केल्यामुळे आणि झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज रत्नागिरी शहरवासीयांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संपूर्ण योजनेच्या कामाची चौकशी व्हावी आणि संबधित सर्व दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केली.
पाणीबाणी संदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषद कीर बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे नेते बशीरभाई मुर्तूजा, शहराध्यक्ष नीलेश भोसलेही उपस्थित होते.
तत्कालिन सत्ताधाऱ्यावर, आताचे लोकप्रतिनिधी आणि नगर पालिका प्रशासन यांच्या सुरू असलेल्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. सुधारित नळपाणी योजनेच्या कामाची मंजूरी 2016 रोजी मिळालेली होती. पण निविदा प्रक्रिया होऊन वर्कऑर्डर होईपर्यंत 2017 साल उजाडले. काम पूर्ण करण्याचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. म्हणजेच योजना 2019 पूर्वीच पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र सुमारे सहावेळा मुदतवाढ देवूनही पाणी योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी 2023 साल उजाडले. तरीही नळपाणी योजना अपूर्ण अवस्थेत आहे. या योजनेचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. अजूनही 10 टक्के काम पूर्ण होणे बाकी असल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी आजही टाहो फोडण्याची वेळ येत आहे.
ही योजना अपूर्ण असतानाही हायड्रोलिक प्रेशर चाचणी करणेच चुकीचे आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर शीळ धरण ते जॅकवेल अशी 400 मिटर वाहिनी, पानवल धरण ते फिल्टर हाऊस अशी 1350 मीटर ग्रॅव्हिटी मेन लाईन, फिल्टर हाउस चे शिल्लक काम, जयस्तंभ ते खालील भागामध्ये टाकलेली निकृष्ट दर्जाची पाईप लाईन बदलण्याची आवश्यकता आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय हायड्रोलिक चाचणी करू नये अशी मागणी श्री. कीर यांनी केली आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button