
आपले सरकार जिल्हा कार्यालय उद्या कार्यान्वित होणार
रत्नागिरी दिनांक 03 – रत्नागिरी जिल्हयात आपले सरकार सेवा केंद्र एकूण 774 असून सद्यास्थितीत 637 कार्यरत आहेत. सदर जिल्हयातील सर्व केंद्राशी चांगल्या प्रकारे समन्वय होण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जुनी इमारत, दुसरा मजला येथे स्थापित करण्यात आले आहे. सदर कार्यालय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्या शनिवार दि. 04 जानेवारी 2020 रोजी दुपारी 01.00 वाजता कार्यान्वीत करण्यात येणार आहे.
*महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना*
*लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार अद्ययावत करावे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण*
रत्नागिरी दि.03 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या लाभासाठी आधारकार्ड अद्ययावत असणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी आधार कार्ड अद्ययावत करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.शासनाने 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ची घोषणा केली असून या योजनेच्या अमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 2020 खरीप हंगाम कर्ज मिळविण्यासाठी पात्र करणे हा महत्वाचा या योजना उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे. अल्प मुदत पीक कर्ज 01 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या हंगामी पीक व किसान क्रेडीट कार्ड योजनेतील थकीत असलेली व परतफेड न झालेली कर्ज. पुनर्गठित/फेरपुनर्गठन कर्ज : 01 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाचे, पुनर्गठन/फेरपुनर्गठन करुन मध्यम मदुत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त थकीत असलेल्या व परतफे न झालेले कर्ज.30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल अधिक व्याज दोन्ही मिळून रुपये 2 लाख कमाल मर्यादा असणार आहे.राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, खाजगी बँक, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वि.का.स.संस्था (जिमस बँकामार्फत), वि.का.स. संस्था (व्यापारी बँकामार्फत), वि.का.स. संस्था (स्वनिधी).आधारकार्ड या योजनाचा मुलभूत आत्मा आहे. या योजनेचा आधार क्रमांक आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज खात्याला आधार क्रमांक जोडावा तसेच कर्ज प्रकरणातील नाव व आधार कार्ड वरील नावात काही तफावत असेल तर तातडीने आधारकार्डातील तपशील प्रमाणे बँकेच्या कर्ज प्रकरणातील नावात व इतर तपशीलात दुरुस्ती करावी असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आवाहन केले आहे.
www.konkantoday.com