
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!
विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विविध नेत्यांचे सध्या महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. या अनुषंगानेच आज महाविकास आघाडीचा मेळावा आज मुंबईत षण्मुखानंद सभागृहात पार पडला.*या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? यावरून चर्चा सुरु आहेत. मात्र, आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? यावर आता उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो *: उद्धव ठाकरे**उद्धव ठाकरे काय म्हणाले?*“निवडणूक आयोग आज काहीतरी घोषणा करणार आहे. माझं मत आहे की आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकच जाहीर करून टाकावी. आमची तयारी आहे. तयारी आहे हे बोलायला सोप्प वाटतं. मात्र, ही लढाई पाहिजे तेवढी सोपी नाही. लोकसभा निवडणुकीत आपण राजकीय शत्रूला पाणी पाजलं. लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या संरक्षणाची लढाई होती. आता ही लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे. ही लढाई कशी असावी एक तर तू राहशील किंवा मी राहील. तू राहशील किंवा मी राहील ही लढाई आपल्या मित्र पक्षात नको, म्हणजे महाविकास आघाडीत नको. जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत, त्यांना आपण मिळून एकतर तू राहशील किंवा मी राहील, हे सांगू”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.*मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?*“महायुती सरकारला आता जाग आली आहे. आता ते पाण्यात डुबक्या मारून पाहत आहेत की पवित्र होता येईल का? मग ते सगळीकडे स्वत:चे फोटो छापत आहेत. मात्र, आपण ही निवडणूक अशी लढायची हे आपण ठरवायचं आहे. पण आपल्यामध्ये काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे चेहरा आहेत की आणखी कोण आहे? मी आता या ठिकाणी सांगतो, येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, आमचा शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा असेल, असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.