
मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबईमध्ये बोलत होते.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. एनडीएला 19 जागांवरच समाधान मानावे लागले. 2019 च्या निवडणुकीत 22 जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही, याची कबुली दिली. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणेही सांगितली.महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या आपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये सविंधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.www.konkantoday.com