
डॉ. विनय नातू हे संस्कारक्षम कुटुंबात वाढलेले व्यक्तीमत्व त्यांना त्यांच्या स्वभावानुसार काम करू द्या, आमदार शेखर निकम यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
डॉ. विनय नातू यांनी आक्रमक होण्याबरोबरच स्वभावात बदल करण्याची आर्जव कार्यकर्त्यांकडून केली जाते. मात्र संस्कारक्षम कुटुंबात वाढलेले ते व्यक्तीमत्व असून त्यांना त्यांच्या स्वभावानुसार काम करू द्या, असा सल्ला आमदार शेखर निकम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.डॉ. विनय नातू फॅन क्लबच्यावतीने मार्गताम्हाने येथील आनंदराव शिर्के मंगल कार्यालयात माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा ६० व्या अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी आमदार निकम उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राजकारणात काहीना खोटे बोला पण रेटून बोला, अशी सवय असते. त्यांना दुसर्याचेच दोष दिसतात. पण सगळ्यांचाच स्वभाव तसा नसतो. मात्र चांगल्या स्वभावाच्या माणसांना उशिरा का होईना न्याय मिळतो. स्पष्ट बोलायचे झाले तर डॉ. नातू यांच्यावर पक्षाने तसा अन्यायच केला आहे. ते आज पक्षामध्ये सर्वात जुने नेते आहेत. त्यांच्या कामांचे स्वरूप मी जवळून पाहिले आहे. फक्त त्यांच्या चांगल्या स्वभावगुणांमुळे ते मागे पडले असतील, पण ही कसर आगामी काळात नक्की भरून निघेल, असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला.स्व. गोविंदराव निकम व स्व. डॉ. तात्यासाहेब नातू हे यापूर्वी लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात होते. मात्र त्यांनी वैयक्तिक पातळीवर कधीच राजकारण आणले नाही. इतके कौटुंबिक संबंध आमचे चांगले होते. आमच्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या एका टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मान्यतेत तात्या नातू यांचा सिंहाचा वाटा असल्याची आठवण शेवटी निकम यांनी करून दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, राष्ट्रवादी अजित पवार गट तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, भाजपच्या चित्रा चव्हाण, निलम गोंधळी, विनय नातू यांच्या पत्नी विनिता नातू, सतिश मोरे, वसंत ताम्हणकर, खेडचे तालुकाप्रमुख शरद शिगवण यांच्यासह बहुसंख्य हितचिंतक व महिला उपस्थित होत्या. www.konkantoday.com