
पोलिसांची नोटीस : जरांगेंनी दाखवली ‘टोपली’, म्हणाले मेलो तरी हटणार नाही
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणचा आज पाचवा दिवस आहे. हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर सुरु असून जरांगेच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधवही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.दरम्यान असे असताना पोलिसांनी आझाद मैदान खाली करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर मैदान खाली करा असे नोटीशीमध्ये म्हटलं आहे. मात्र मेलो तरी, मागे हटणार नाही असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
पोलिसांच्या नोटीशीनंतर जरांगे पाटलांनी आंदोलकांना संबोधित केलं. जरांगे पाटील म्हणाले, मेलो तरी, मागे हटणार नाही. मागण्या मान्य झाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही. काय व्हायचे ते होऊ द्या. सरकारला आमच्या विरोधात न्यायालयात जाउ द्या किंवा आणखी कुठेही जाऊद्या पण तरीही मी सरकारला व फडणवीसांना सांगतो की, सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईत सोडत नाही असं असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय, मराठा आणि कुणबी एकच आहे या जीआरशिवाय मुंबई सोडत नसल्याचे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं. न्यायदेवतेने आजवर आम्हाला न्याय दिला आहे. आताही आमच्याबाजुने न्याय करेल. आम्ही शांततेत उपोषणाला बसलो आहोत. न्यायालयाने रस्त्यावरील गाड्या काढायला सांगितले होते, त्यानंतर चार ते पाच तासांत आमच्या पोरांनी गाड्या काढल्या. आम्ही कायद्याचे व न्याय देवतेच्या आदेशाचे पालन करतो. पुढे न्याय देवता सांगेल तसे पालन करु असे जरांगे म्हणाले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात कुठेही कटुता नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात. फडणवीसांनी पोलिसांच्या माध्यमातून आमच्या पोरांवर लाठीचार्ज करण्याचा विचार करु नये. नाही तर आम्ही दाखवून देऊ मराठा काय आहे. राज्यातल्या सगळ्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. आमच्यावर ज्या पोलिसांनी हल्ले केले त्या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा असेही जरांगे पाटील म्हणाले.त्यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करा म्हणून सांगितलं. मी मेल्याच्या नंतरही तुम्ही शांत राहा. आपल्याला ही लढाई शांततेत लढायची व जिंकायची आहे. पोरांना कोर्टाचे नियमांचे पालन करा. कोर्टाकडून आपल्याला परवानगी मिळेल. आपल्यावर अन्याय करणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.




