
निवडणुकीच्या काळात जप्त केलेले पैसे आणि दारूचे निवडणूक आयोग काय करते?
देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान, तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर देशात आचारसंहिता लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असतात. यासाठी वापरला जातो तो पैसा आणि दारू. त्यामुळेच निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात पैसा, दारू जप्त होते. या पैशांचं आणि दारूचं काय होतं? ती कुठे जाते? याबद्दल आज थोडक्यात जाणून घेऊया…*जप्त केलेल्या पैशांचं काय होतं?*निवडणुकीदरम्यान पोलिसांनी जी काही रोख रक्कम जप्त केली आहे, ती आयकर विभागाकडे सोपवली जाते. पोलीस ज्या व्यक्तीकडून रोख रक्कम गोळा करतात ती व्यक्ती नंतर त्यावर दावा करू शकते. हा पैसा स्वतःचा आहे आणि तो बेकायदेशीरपणे कमावला गेला नाही हे सिद्ध करण्यात ती व्यक्ती यशस्वी झाली, तिने पुरावा म्हणून संपूर्ण माहिती सादर केली तर तिला ते पैसे परत केले जातात. पुराव्यासाठी एटीएम व्यवहार, बँकेची पावती आणि पासबुकमधील नोंद असणं आवश्यक आहे. जप्त केलेल्या रकमेवर कोणी दावा केला नाही तर तो सरकारी तिजोरीत जमा होतो.*जप्त दारूचं काय होतं?*पैशांसोबतच मोठ्या प्रमाणात दारूही जप्त केली जाते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूचा वापर केला जातो. या दारूची कायदेशीर वाहतूक होत असल्यास ती सोडली जाते. मात्र कागदपत्रांशिवाय वाहतूक केल्यास ती जप्त केली जाते. निवडणुकीदरम्यान सापडलेली सर्व दारू प्रथम एकाच ठिकाणी जमा केली जाते. नंतर ती एकत्र नष्ट केली जाते.www.konkantoday.com