
रत्नदुर्ग किल्ल्याने घेतला मोकळा श्वास
गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीचे वैभव किल्ले रत्नदुर्गवर स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत गडावरील तटबंदी व बुरुजांवरील वाढलेली झाडेझुडुपे हटविण्यात आली. त्यामुळे अनेक बुरुजांनी जणू मोकळा श्वास घेतला. याशिवाय गडावर प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्यांचा खचही आढळला. या सार्या कचर्याचे संकलन करून तो नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. गडांचे पावित्र्य राखले जात नसल्याबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. रत्नदुर्ग किल्ल्यावर दोन दिवसांपूर्वी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. ही मोहीम गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष दिपेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली झाली. या मोहिमेत अनिकेत वाडकर, प्रणव सिनकर, शुभम आग्रे, साहिल जाधव, मंथन पाडावे, मयूर भितळे, समृद्धी चाळके, मानसी चव्हाण, सेजल मेस्त्री, खुशी गोताड, ओमकार सावंतदेसाई, सौरभ बळकटे, तन्मय जाधव, अर्थव रसाळ, प्रीतम मांडवकर, रश्मी जाधव, श्वेता भितळे यांच्यासह एकूण ३० गडप्रेमींनी सहभाग घेतला. रत्नदुर्ग किल्ल्यावर अनेक वेळा मद्यपी व उपद्रवी लोक येऊन दारूचे सेवन करतात, असे यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे. आपल्या ऐतिहासिक गडांचे पावित्र्य जपले पाहिजे, यामुळे अशा मद्यपींवर कारवाई व्हावी, अशी गडप्रेमींची मागणी आहे.www.konkantoday.com