![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240202-WA0000.jpg)
आमदारकी गेल्यावर कचऱ्याच्या टोपलीत टाकले- भाजपामध्ये प्रवेश केल्यावर सूर्यकांत दळवी यांचा उद्धव ठाकरे यांचेवर आरोप
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.सूर्यकांत दळवी हे तब्बल 25 वर्ष दापोलीचे आमदार होते. ते 1990 पासून 2004 पर्यंत आमदार होते. आमदारकीचा इतका काळ गाजवलेले दापोलीतील प्रसिद्ध नेते सूर्यकांत दळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आमदारकी गेल्यावर कचऱ्याच्या टोपलीत टाकले, असा आरोप सूर्यकांत दळवी यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
“२५ वर्ष आम्ही संघर्ष केला आणि प्रवेश करत आहोत. एखादी मुलगी जेव्हा लग्न करुन दुसऱ्या घरात जाते तेव्हा काही गोष्टी शिकायला वेळ लागतो. आम्हालाही या पक्षात काही गोष्टी शिकायला वेळ लागेल. आम्ही वैयक्तिक काही मागणार नाही. पण पक्ष वाढीसाठी जसं शिवसेनेसाठी काम केलं तसं भाजपसाठी काम करु”, असं सूर्यकांत दळवी म्हणाले.भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचा खूप अभ्यास करावा लागेल. ते कधी झोपतात तेच कळत नाही. त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत हा झेंडा खाली उतरणार नाही. मी गेले ४० वर्ष शिवसेनेत होतो. आज भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक कार्यकर्ते देखील आले. ही सुरवात आहे. एक भव्य मेळावा दापोलीत घ्यायचा हे आमच स्वप्न आहे. दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि कोकणात रवींद्र. आज एकच बोलतो. आजपासून जय श्री राम आणि उद्यापासून दापोली मतदार संघाच्या विकासाचं काम. कचऱ्याच्या टोपलीत पडलेली अवस्था होत असेल आणि त्याला कोणीतरी हाक मारत असेल म्हणून आजचा हा दिवस आहे”, अशी भूमिका सूर्यकांत दळवी यांनी व्यक्त केली.
“भाजपचं नेतृत्व चांगलं आहे. या प्रवाहात आपण सामील होणे काय गुन्हा आहे? काम करायला वाव मिळेल. आपण आणखी चांगली कामे करावी. दापोलीचा पर्यटन तालुका करण्याकरिता माझ्यामागे हे उभे राहतील हा विश्वास आहे. अनेक प्रकल्प मार्गी लावण्याकरिता सर्व भाजपच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. कमळ कोकणात फुलले पाहिजे”, असं सूर्यकांत दळवी म्हणाले.
www.konkantoday.com