राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले. या निवडणुकीत भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार आघाडी घेतली आहे.शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं.
‘घरी बसणाऱ्यांना जनतेनं घरी बसवले,’ अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. याला उद्धव ठाकरेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. पत्रकार राहुल गडपाले यांच्या ‘अवतरणार्थ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेना काँग्रेसबरोबर गेली म्हणजे ‘शिवसेनेची काँग्रेस’ झाली म्हणतात. गेली ३० वर्ष आम्ही भाजपाबरोबर होतो. मात्र, आमचा कधी भाजपा झाला नाही. मग, काँग्रेस कसा होईल? शिवसेनेनं भाजपाला सोडलंय, हिंदूत्वाला नाही. भाजपाने हिंदूत्वाची मालकी घेतली नाही. मला भाजपाचं हिंदूत्व मान्य नाही,’ अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
‘फक्त टोमणे, आरोप-प्रत्यारोपात वर्ष घालवले. ज्यांनी मतदारांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना लोकांनी नाकारलं आहे. मतदारांशी प्रतारणा केलेल्यांना जनतेनं घरी बसवलं. असेही घरी बसण्याची सवय त्यांना होतीच,’ असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.
www.konkantoday.com