पाणथळ जागांच्या रक्षणासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील

रत्नागिरी, ता. २ : पाणथळातील खारफुटी वनक्षेत्र हे जमीन व पाणी यांना पोषक आहे. त्सुनामीसारखे संकटही हे क्षेत्र रोखू शकते. खारफुटीच्या रक्षणासाठी महसूल, वन विभाग आणि पोलीस हे आपापल्या परीने कार्य करीत आहेत. जनतेने देखील या पाणथळ जागांच्या रक्षणांसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग, कांदळवन कक्ष, रत्नागिरी, कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाणथळ दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी वन विभाग, कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील, तहसिलदार शशिकांत जाधव, तहसिलदार (महसूल) तेजस्विनी पाटील, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. पाटील म्हणाले की, प्रशासन म्हणून पाणथळ जमिनींचे महत्त्व आम्ही पुढच्या पिढीला सांगतोय. त्यांनी जागरुकपणे या जमिनींचे संरक्षण करावे,यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करत आहोत. रत्नागिरीत जुवे, कर्ला आंबेशेत येथे खारफुटी उद्यान विकसित केले जाणार आहे. जैवविविधता, परिसंस्था, पाणथळ जागांतून बऱ्याच गोष्टी मिळतात. त्यामुळे या पाणथळ जागांचे संरक्षण केले पाहिजे.
यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button