नव रत्नागिरीचा उदय ~ बदलते रत्नागिरी शहर

कोकणचा नवा भाग्यविधाता आणि दूरदृष्टीचा नेता श्री उदयजी सामंत

देशाचे माजी अर्थमंत्री स्व. चिंतामणराव देशमुख यांच्यापासून ते कोकण रेल्वेचे शिल्पकार स्व.मधूजी दंडवते, बॅरिस्टर नाथ पै यांच्यापर्यंत आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू यांच्या पासून ते माजी मुख्यमंत्री श्री.नारायणजी राणे साहेब यांच्या पर्यंत कोकण भूमीने आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक दूरदृष्टी लाभलेले नेते दिले आहेत. या सर्व नेत्यांनी आपाआपल्या कार्यकाळात सर्वोत्तम काम करून महाराष्ट्राला पुढे न्यायचे काम केलेच पण त्यासोबतच कोकणभूमीचा सर्वतोपरी विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता या दूरदृष्टीच्या नेत्यांच्या मांदियाळीत कोकणभूमीतील रत्नागिरीसुपुत्र श्री उदयजी सामंत साहेब यांचा समावेश करावाच लागेल एवढं मोठं रचनात्मक काम श्री सामंत यांनी करून दाखविले आहे.

मागील महिन्यात रत्नागिरीत दुबईच्या धर्तीवर थिबा पॅलेस येथे लाईट अँड साऊंड लेझर शोचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या अगोदर एक दिवस रत्नागिरीत राहण्याचा योग आला. खरं तर , राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हिरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात ज्या लहान मुलांच्या हृदयाला जन्मतः छिद्र आहे अशा लहान मुलांच्या मोफत 2D इको तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे नियोजन रत्नागिरी मध्ये करण्याच्या निमित्ताने जाण्याचा योग आला होता. यासंदर्भात भेटता क्षणीच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.उदय सामंत साहेब यांनी त्यांच्या स्वतःचा वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी सांभाळणारे श्री महेश सामंत यांस जोडून दिले आणि आरोग्य शिबिराचे नियोजन फक्त तासाभरात झाले. यापूर्वी देखील मुंबई येथील वाडिया हॉस्पिटल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि मा.ना.श्री.उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर पार पडले होते. यामध्ये 100 पेक्षा अधिक लहान मुलांची मोफत यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आमच्या टीमला यश आले होते. गेल्या वर्षी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या या भव्य आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमास स्वतः पालकमंत्री श्री.उदय सामंत साहेब यांनी उपस्थित राहून आमच्या टीमला शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले होते. यावेळी मुंबई येथील बालाजी हॉस्पिटल, ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल, श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, मुलुंड येथील अपेक्स हॉस्पिटल आदी हॉस्पिटलच्या सहकार्याने संपूर्णतः मोफत शस्त्रक्रिया पार पडत आहेत.

मंगेश, “आरोग्य शिबिराचे नियोजन तर झाले चला आता रत्नागिरी शहरात फेरफटका मारुयात, शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची मला पाहणी देखील करायची आहे. येणार ना..?” असा प्रश्न श्री उदय सामंत यांनी केला. “होय , अर्थातच मला आवडेल.” असं मी उत्तर दिलं. तेव्हा, मंगेश ” फक्त 5 मिनिटे मी पोशाख बदलून येतो” असे श्री सामंत साहेब म्हणाले. आणि त्यानंतर अक्षरशः फक्त 5 मिनिटातच श्री.उदय सामंत साहेब जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून घरातून बाहेर आले. मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण स्वतःच्या मतदारसंघात नेत्यांचा पारंपरिक पोशाख झब्बा आणि कुर्ता न परिधान करता चक्क जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट वर फिरणे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. निवासस्थानी आपले सहकारी शिवसेना तालुका प्रमुख श्री बाबू म्हाप यांच्या थार गाडीच्या ड्रायविंग सीट वर बसून श्री. उदय सामंत साहेब यांनी आश्चर्याचा दुसरा धक्का दिला. आपले सहकारी असलेल्या तालुका प्रमुखाविषयी एवढी आत्मीयता की श्री.उदय सामंत साहेब यांनी त्यांस ड्रायविंग सीट शेजारी बसविले. मी मागे बसलो. गाडी निघणार तेवढ्यात, दूर कुठूनतरी गावखेड्यातुन आलेल्या एका शिवसैनिकाने गाडी अडविली आणि त्यांस बोलला “साहेब , माझ एक काम आहे. या अधिकाऱ्यास फोन लावायचा आहे.” मला वाटले आता श्री सामंत साहेब म्हणतील की मी आता निघालोय , माझ्या PA ला भेटा मी त्याला सांगतो. पण मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्तव्यपथावर चालणाऱ्या श्री.उदय सामंत साहेब यांनी त्या शिवसैनिकाचे ऐकून घेतले आणि त्यास सांगितले की “चला, गाडीत बसा, प्रवासात फोन लावू.” आणि पाली या श्री.उदय सामंत साहेब यांच्या मूळ गावापासून आमचा रत्नागिरीकडे प्रवास सुरु झाला. वाटेतच, शेजारी बसलेल्या तालुका प्रमुख श्री.बाबा यांच्या फोनवरून संबंधित अधिकाऱ्यास फोन करून गाडीत पाठीमागे बसलेल्या शिवसैनिकाचे काम मार्गी लावले. संबंधित अधिकाऱ्यांना बोलताना देखील श्री.उदय सामंत साहेब यांनी प्रथम विनंतीपूर्वक आणि अधिकारी टाळाटाळ करत आहे असे लक्षात येताच त्यांच्या स्वतःच्या खास शैलीत माझा शिवसैनिक आहे, काम करा आणि झाल्यानंतर काम झाले असे मला फोन करून सांगा अशी तंबी दिली. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा “फैसला ऑन द स्पॉटची” प्रचीती यानिमित्ताने पुन्हा आली.

प्रवासात नुकत्याच गाजलेल्या छावा सिनेमातील श्री. उदय सामंत साहेब यांनी आवडते गाणे “आवो विराजो, आओ विराजो, शंभूराजे आओ विराजो…” गाणे प्रवासात मोठ्या आवाजात लावले..पाली ते रत्नागिरी प्रवासात छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांच्याविषयी अनेक – विविध संदर्भ श्री.उदय सामंत साहेब सांगत होते..त्यातील काही ऐतिहासिक संदर्भ सांगताना थार गाडीतील आम्हाला सर्वांना एखादा इतिहास संशोधक बोलत असल्याचा भास झाला…शिव-शंभूच्या याच निस्सीम भक्तीपायी रत्नागिरीत महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा श्री.उदयजी सामंत साहेब यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने आणि अविश्रांत मेहनतीने साकारला आहे..तर रत्नागिरीच्या समुद्र तटावर भव्य अशी शिवसृष्टी साकारली आहे..रत्नागिरीचे ही शिवसृष्टी, शिवराय आणि शंभूराजे यांचे भव्य पुतळे, मुंबईतील नेहरू तारांगणच्या धर्तीवर साकारलेले भव्य हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण, वारकरी बांधवांसाठी उभारलेले श्री पांडुरंगाचे भव्य शिल्प, थिबा पॅलेस येथे दुबईच्या धर्तीवर साकारण्यात आलेला लाईट अँड साऊंड लेझर शो आणि बरेच काही..श्री उदय सामंत साहेब यांनी रत्नागिरीत कामाचा एवढा मोठा डोंगर उभारला आहे की, भविष्यात कोकण फिरायला आलेल्या प्रत्येक पर्यटकाला किमान 1 अक्खा दिवस रत्नागिरी फिरण्यासाठी राखीव ठेवावा लागेल..अर्थात हा लेख पुढे वाचताना यातील अनेक संदर्भ येतीलच…पण, कोकणात फिरायला आलेल्या प्रत्येक पर्यटकाने रत्नागिरीच्या समुद्रतटावरील भव्य शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी, त्याशिवाय कोकण ट्रिप पूर्ण होणार नाही…

तर,शिवभक्त श्री. उदय सामंत यांच्या हातात असलेलं थार गाडीच स्टेरिंग याच शिवसृष्टीच्या दिशेने वळालं नाही तरच नवल…रत्नागिरी शहरातून शिवसृष्टीकडे जात असताना जवळपास प्रत्येक दुकानदाराला आणि रस्त्याने जाताना हात दाखवत असलेल्या प्रत्येक रत्नागिरीकराला उत्तर म्हणून कधी हात करत, तर कधी स्मित हास्य करत श्री.उदय सामंत साहेब अगदी सहजपणे गाडी चालवत होते…ना – मंत्री पदाचा बडेजाव..ना – लोकप्रतिनिधी असल्याचा माज…सर्व काही एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे सुरू असलेला हा प्रवास माझ्यासाठी मात्र आश्चर्यचकित करणारा होता…(कारण पश्चिम महाराष्ट्रात साधा नगरसेवक देखील हल्ली अनेक गाड्यांचा ताफा घेऊन – बाऊंसर व सुरक्षा रक्षक घेऊन मिरवितो..अशा युगात कोकणातील या नेत्यांच्या साधेपणाचा नक्कीच आदर्श घेण्यासारखा आहे..)

गाडी शिवसृष्टीजवळ येऊन पोहीचली..इथे समुद्र किनाऱ्याच्या अथांगतेला आव्हान देणारा भव्य असा छत्रपती शिवरायांचा पुतळा नजरेस पडला आणि हात आपोआपचं कपाळावर गेला..छत्रपती शिवरायांना मनापासून वंदन केल..शिवसृष्टीत आत प्रवेश करताना स्वागताला उभे असलेले २ तुतारी वादक खरे आहेत की काय ? असा प्रश्न पडण्या इतपत आखीव रेखीव मुर्त्या आणि रंगरंगोटी काम इथे करण्यात आलेले आहे…शिवसृष्टीच्या आत प्रवेश करतानाच तत्कालीन शेतीप्रधान संस्कृतीचे दर्शन घडते..आणखी थोड पुढं जाताच छत्रपतींचे मावळे आपले लक्ष वेधून घेतात..आणि सर्वात लक्षवेधी ठरतात त्या कोकणातील जलदुर्गांच्या अतिशय बारकाईने तयार केलेल्या प्रतिकृती..भव्य अशा निळ्याशार समुद्राच्या तटावर साकारलेली ही महाराष्ट्रातील एकमेव शिवसृष्टी आहे..भव्य अशा समुद्राकडे पाहत असलेले छत्रपती शिवराय जणू समुद्रालाच आव्हान देत होते…दुसरीकडे सूर्य मावळतीला चालला होता..अवघ आकाश भगवं झालं होतं…सूर्यबिंब भगवं झालं होते; जणू सूर्य देखील दररोज मावळतीला जाताना छत्रपती शिवरायांना भगवी सलामी देऊनच निरोप घेतो..रात्रीच्या लाईट इफेक्ट्स मध्ये तर या शिवसृष्टीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते…

इथेही शिवसृष्टीची पाहणी करत असताना श्री.उदय सामंत साहेब संबंधित कंत्राटदाराला सूचना देत होते, खास करून लाईट इफेक्टस आणि स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय बारकाईने निरीक्षण करून त्यांनी काही सूचना केल्या आणि तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या..

शिवसृष्टी डोळ्यांत साठवत होतो, तेवढ्यात श्री. उदय सामंत साहेब म्हणाले, “चला आपल्याला अजून छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा पहायचा आहे, त्यांनतर हिंदुहृद्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण देखील पाहायचे आहे. तिथेही भरपूर वेळ लागणार आहे.” लगोलग आम्ही रत्नागिरी शहराच्या बाजूलाच असलेल्या आणि शहराचे वैभव बनलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळा आणि तेथील गार्डनला भेट दिली. त्यावेळी श्री.उदय सामंत साहेब म्हणाले, “समुद्र आणि शंभूराजे म्हणजे जणू एक अद्वैत नात झाल होत. रामायणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामानंतर हजारो वर्षांनी समुद्रावर सेतू उभारण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त शंभुराजे यांनी केला. जंजिरा भेदण म्हणजे साक्षात मृत्यूवर विजय मिळवणं. हबशी सिद्धीच्या जोखडातून जंजिरा जिंकून घेणं म्हणजे केवळ अशक्यप्राय गोष्ट. पण जंजिरावर कब्जा करण्यासाठी शंभुराजे यांनी समुद्रात सेतू उभारला. जवळपास अर्धा सेतू बांधून झाला; जंजिरा जणू टप्प्यात आला होता. पण रायगडवरून अतीतटीचा आलेला निरोप आणि राजधानी रायगड सुरक्षित राखण्यासाठी शंभुराजे जंजिरा मोहीम अर्ध्यावर सोडून रायगडाकडे निघाले.” आणि म्हणूनच विशाल आणि महाकाय समुद्राला आव्हान देणारा , समुद्र जिंकू पाहणारा शिवपुत्र शंभूराजे यांचा पुतळा समुद्राच्या साक्षीने उभा आहे. कुठल्याही मोठ्या संकटासमोर लढण्याची जिद्द आणि प्रेरणा हा पुतळा आम्हा रत्नागिरीकरांना देत राहील.” श्री. उदय सामंत साहेब एकाचवेळी इतिहास संशोधक आणि शिवव्याख्याते या दोहोंच्या रूपात भासले.

मी म्हणालो, “साहेब फक्त रत्नागिरीकरांना नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला शंभुराजे यांचा हा पुतळा प्रेरणा देत राहील.” समुद्र तटावर एकाच वेळी , एकाच शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या जीवा शिवाचे नाते असलेल्या पिता – पुत्राचे जिवंत स्मारक उभारण्याचे शिवधनुष्य शिवभक्त श्री उदयजी सामंत यांनी लीलया पेलल आहे.

पुढे आमची गाडी रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठ मध्ये आली. इथे श्री.उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उभारण्यात येत असलेले सर्वात भव्य एस. टी. स्टँड त्यांनी दाखविले. तिथून पुढे काही अंतरावर रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्याने होत असलेल्या इमारतीचे काम दाखविले. येताना नव्याने उभारण्यात येत असलेले जिल्हाधिकारी कार्यालय आणि नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे काम दाखविले. एखादा लोकप्रतिनिधी एवढ मोठ आभाळा एवढ काम आपल्या मतदारसंघात करू शकतो यावर माझा विश्वासचं बसत नव्हता.

पुढे आल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री पांडुरंगचा कडेवर हात असलेला भव्य पुतळा पाहून आणखी मन सुखावले. इथे आलो तेव्हा रात्री 7.30 वाजले होते आणि पाहतो तर, रत्नागिरी शहरातील सर्व अबालवृद्ध मंडळी श्री पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने गर्दी करताना पाहिली.

पुढे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण पाहिल्यानंतर आणि अनुभवल्या नंतर आपण रत्नागिरी मध्ये आहोत की मुंबईत असा प्रश्न पडला. या तारांगणात काय नाही..? सूर्यप्रकाश वर चालणाऱ्या घड्याळया पासून ते अंतराळातील ग्रह- उपग्रह पाहण्याची व्यवस्था केलेल्या दुर्बिणी आहेत. अग्नी, पृथ्वी क्षेपणास्त्र यांची माहिती देणारी प्रतिकृती आहेत. माकडापासून ते आदिमानव आणि नंतर माणूस होण्यापर्यंतचा प्रवास भित्ती शिल्प मधून साकारला आहे. आत सर्व ग्रह यांच्या प्रतिकृती केल्या असून अवघ नक्षत्र उभारल आहे. पुढे आत आल्यानंतर भव्य ऑटोडोरियम आहे. यात विशिष्ट प्रकारचा चष्मा घालून तुम्हाला ३६० डिग्री ची सफर घडविली जाते. यात अनेक विविध डॉक्युमेंटरी दाखविल्या जातात. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला मानवाने चंद्रावर टाकलेले पहिले पाऊल ही डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली. विशिष्ट प्रकारचा चष्मा परिधान केल्याने आणि स्क्रीन ३६० डिग्री असल्याने नील आर्मस्ट्राँग सोबत आपणच स्वतः चंद्रावर पाऊले टाकत असल्याचा भास होतो. मी यावर अधिक काही बोलण्या आणि लिहण्या पेक्षा हा फील एकदा घ्यायलाच हवा. तारांगण मधून बाहेर पडताना तिथेच एका दर्शनी भागात रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक स्थळे, किल्ले, मंदिरे यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.

तारांगण मधून बाहेर आल्यानंतर मी श्री उदयजी सामंत साहेब यांस “केवळ अद्भुत , हे सर्व पाहून मी भारावून गेलो “ एवढीच प्रतिक्रिया दिली. यावर त्यांनी ” ज्याचे उद्या उद्घाटन होणार आहे त्या थिबा पॅलेसच्या लाइट अँड साउंड शो ला अजून भेट द्यायची आहे, तेव्हा प्रतिक्रिया द्या. चला.” असे सांगितले.

रत्नागिरीचे आकर्षण आणि एक स्वतंत्र ओळख बनलेल्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण’ मधून आम्ही थेट थिबा पॅलेस कडे निघालो..जाताना वाटेत एका भव्य इमारतीचे काम सुरू होते, त्या ठिकाणी थांबत श्री.उदय सामंत साहेब म्हणाले “हे पहा, पुढील काही दिवसांत उद्घाटन होणार असलेले हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय घेतला तो म्हणजे माझ्या रत्नागिरी मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा. त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमीपूजन देखील त्यांच्याच शुभहस्ते झालेले आहे. आणि इथून जवळच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. त्याचे काम पूर्ण करण्यात देखील आम्हाला यश आले आहे. आता, माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील आणि कोकणातील विद्यार्थ्याना डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. “ श्री उदयजी सामंत साहेब यांच्या चेहऱ्यावर कृतकृत्य भाव होते. माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील, माझ्या कोकणातील असा त्यांच्या तोंडून येत असलेला शब्दप्रयोग त्यांची मातृभूमी विषयी असलेल निस्सीम प्रेम आणि आंतरिक ओढ दाखवत होता.

पुढे काही वेळात आम्ही थिबा पॅलेस ठिकाणी पोहोचलो. उतरल्या उतरल्या श्री.उदय सामंत साहेब यांनी संबंधित कंत्राटदार आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्टाइल स्वच्छतेच्या मुद्यावरून मध्ये फैलावर घेतले. स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे अधिकची माणसे कामाला लावून आज रातोरात संपवा असे आदेशच त्यांनी उपस्थित सर्वांना दिले. त्यांनतर थिबा पॅलेस वर दुबई च्या धर्तीवर लाइट अँड साऊंड लेसर शो ची ज्या विशिष्ट रूम मधून मॉनिटरिंग केलं जाणार होत त्या रूमची पाहणी केली. तदनंतर हा शो पाहण्यासाठी ज्या विशेष आसनांची व्यवस्था केलेली आहे त्या आसनांवर आम्ही स्थानापन्न झालो. शो सुरू होण्यापूर्वी श्री.उदय सामंत साहेब यांनी आम्हाला अधिकची माहिती दिली. “म्यानमार चा राजा थिबा यांस ब्रिटिशांनी कैद करून रत्नागिरी मध्ये आणले. थिबा हा म्यानमार चा राजा असल्याने आणि राजकैदी असल्याने त्याच्यासाठी हा महल बांधण्यात आला. थिबा राजाचा महल म्हणून हा थिबा पॅलेस म्हणून ओळखला जातो. कोकणातील लाल चिरा आणि कौलारू मध्ये याचे संपूर्ण बांधकाम झाल्याने हा पॅलेस अतिशय आखीव रेखीव, दिसायला सुंदर आणि ऐतिहासिक ठेवा असल्याने इथे काहीतरी वेगळ कराव अस डोक्यात होत. त्यातूनच ही संकल्पना पुढे आली आणि ती प्रत्यक्षात साकारते आहे ही माझ्यासाठी प्रचंड अभिमानाची आणि मनाला समाधान देणारी गोष्ट आहे.” चला, आता आपण शो पाहू.

रत्नागिरीच्या त्या ऐतिहासिक थिबा पॅलेस वर दुबईच्या धर्तीवर असणारा लाइट अँड साऊंड लेजर शो सुरू झाला आणि मी अक्षरशः निशब्द झालो. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री सचिन खेडेकर यांच्या ठळक आवाजात कोकण पुण्यभूमीची माहिती देत देत हा शो सुरू होतो आणि सोबतीला लेझर किरणांच्या माध्यमातून दिसणाऱ्या प्रतिकृती. गानकोकिळा स्व.लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या हे “हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा” या गीताने सुरुवात होते आणि अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहते. या शो च्या माध्यमातून हिंदवी स्वराज संस्थापक श्री छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांचा कोकणाशी आलेला संबंध, विविध जलदुर्ग, आरमार ची केलेली उभारणी, हिंदवी स्वराज्याची उभारलेली राजधानी दुर्गदुर्गेश्वर श्रीमंत रायगड, किल्ले सिंधुदुर्ग आदि सर्व माहिती सुरुवातीला देण्यात येते. यानंतर कोकणातील ज्या ६ महान विभूतींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आलेले आहे अशा सर्व भारतरत्नां विषयी आदराने माहिती देण्यात येते.

यात १.स्वातंत्र्यवीर सावरकर, २.आचार्य विनोबा भावे, ३.पा.वा.काणे, ४.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, ५.गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, ६.मास्टर ब्लास्टर क्रिकेपटू सचिन तेंडुलकर आदींचा समावेश आहे. या सर्व ६ कोकण भूमिपुत्र असलेल्या भारतरत्नांची अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी या लेझर शो च्या माध्यमातून करण्यात असलेली आहे. शो पाहताना मी अक्षरशः मंत्रमुग्ध होवून गेलो होतो. शो संपल्या नंतर श्री. उदयजी सामंत साहेब यांनी विचारले “कसा वाटला लेझर शो ? आणि कशी वाटली आमची रत्नागिरी??” मी खरं तर निःशब्द झालो होतो. पण म्हणालो ” लाइट अँड साऊंड लेझर शो अद्भुत तर होताच पण ब्रिटिशांनी बांधलेल्या या ऐतिहासिक थिबा पॅलेसच्या भिंती आज खऱ्या अर्थाने पावन झाल्या असतील. कारण आज लेझर शो च्या प्रतिकृतींच्या निमित्ताने का होईना छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती संभाजीराजांचे पाय या वास्तूला लागले आहेत. तसेच कोकण पुण्य भूमीतील ६ नररत्नांची माहिती या वास्तुवर दाखविण्यात येत असल्याने या ऐतिहासिक थिबा पॅलेसचं सोने झालं आहे अस म्हंटल तर चुकीच ठरू नये. पुणे – मुंबईत मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधा आज रत्नागिरी मध्ये मिळत आहेत. शिक्षण व आरोग्य आणि पर्यटन या मूलभूत विषयांवर रचनात्मक सुरू आहे. मला वाटत रत्नागिरी आणि कोकण उद्याच्या महाराष्ट्राच भविष्य आहे.”

रात्रीची कोकणकन्या एक्सप्रेस पकडायची असल्याने मी.उदयजी सामंत साहेब यांचा निरोप घेतला. निघताना, श्री उदय सामंत साहेब म्हणाले “मंगेश, आज दुपारपासून शहरात फिरताना मी सतत गाड्यांचे नंबर प्लेट पाहत होतो. जवळपास ५० पेक्षा अधिक गाड्या मी पाहिल्या ज्या रत्नागिरी बाहेरील होत्या. विशेषता पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाहने जास्त होती. म्हणजेच पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरी मध्ये येत आहेत. पण माझं स्वप्न आहे की, भविष्यात दररोज ५०० पेक्षा अधिक गाड्या दररोज रत्नागिरी मध्ये याव्यात. एक पर्यटक म्हणून इथल्या निसर्गचा आनंद घ्यावा आणि सोबतच एक शिवभक्त म्हणून इथल्या शिवसृष्टीला भेट देवून छत्रपती शिवरायांना वंदन करावं. रत्नागिरी शहरात भविष्यात आणखी काही असे प्रोजेक्ट करणार आहे की इथे आलेल्या पर्यटकाला रत्नागिरी शहर मधील विविध पॉइंट बघायला किमान २ दिवस लागले पाहिजेत. रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात आणि एकूणच तळकोकणात पर्यटन वाढले तरच कोकणचा विकास होईल आणि पर्यायाने महाराष्ट्राचा देखील.”

मी श्री. उदय सामंत साहेब यांस म्हणालो,”आपल्या मातृभूमीवर एवढं निस्सीम प्रेम करणारा आणि एक व्हिजन ठेवून आपल्या मतदार संघाचा एवढा चौफेर विकास करणारा लोकप्रतिनिधी मी श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नंतर तुमच्यात पाहतो आहे. खर तर महाराष्ट्रातील प्रत्येक नव्या- जुन्या लोकप्रतिनिधीने रत्नागिरी मध्ये यायला हवे आणि ४ दिवस इथे तुमच्या सोबत राहून आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा हे शिकून घ्यायला हवे. कारण विकासाची नेमकी व्याख्या काय असते? मतदारसंघात योजना आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प कशा पद्धतीने राबविले गेले पाहिजेत याचा वस्तुपाठच तुम्ही महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी यांचेसमोर घालून दिलेला आहे.”

“चलो साहेब येतो, पुढील वेळी इथे रत्नागिरीत २ दिवस मुक्कामाचे नियोजन करून येतो” असे म्हणत मी निरोप घेतला. तेव्हा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले श्री. उदय सामंत साहेब म्हणाले “ तुम्ही येईपर्यंत रत्नागिरी मध्ये आणखी एक नवीन प्रोजेक्ट पूर्ण होईल.तो पाहायला जाऊयात.” श्री. सामंत साहेब यांस Best of Luck म्हणत मी रत्नागिरीचा निरोप घेतला.

अनुभव शब्दांकन
मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे,
कक्ष प्रमुख,
मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा
उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button