
ज्येष्ठ लेखकाला आजारपणात मंत्री उदय सामंत यांनी दिला धीर.
ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे हे सध्या गंभीर आजारपणाशी झुंज देत आहेत. आता मला जगण्याचा कंटाळा आला असून, इच्छामरणाची भावना घाटे यांनी व्यक्त केली आहे. मात्र, ‘खचू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत,’ अशा शब्दांत मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी घाटे यांना मानसिक आधार दिला.एका बैठकीसाठी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक व विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे पुण्यात आले असता ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीनिमित्त सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार यांच्याकडून ज्येष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांच्या प्रकृतीबद्दल त्यांना माहिती मिळाली. त्यानंतर देवरे यांनी घाटे यांची भेट घेत त्यांची व्यथा जाणून घेतली.
सामंत यांच्याशी फोनवर संवाद घडवून आणला.निरंजन घाटे यांनी सांगितले की, आजारपणामुळे फक्त पडून राहावे लागते. घरातल्या घरातही हिंडू शकत नाहीत. रोजचा खर्चही दोन-अडीच हजार रुपये आहे. मध्यंतरी पाच दिवस रुग्णालयात होतो, त्यात दिवसाला २० हजार रुपये इतका खर्च झाला. वर्षाला अंदाजे ६० हजार रॉयल्टी वगळता दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. या सगळ्याला मी कंटाळलो आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, की तुम्ही दिल्लीतील वजन वापरून इच्छामरणाचा कायदा लवकर मंजूर करावा. त्यावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. अशा प्रकारे हतबल होण्याची वेळ कोणत्याही लेखकावर येऊ नये, यासाठी विशेष धोरण राबविण्याची गरज असल्याचे सामंत यांनी सांगितले असल्याची माहिती देवरे यांनी दिली.