सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यामुळं मोठी अनेक ठिकाणी हानी
कोकण किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आजदेखील संपूर्ण जिल्ह्यात जाणवला बहुतांशी भागात सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत वादळी वाऱ्यामुळे मोठी हानी झाली. दक्षिण कोकण, गोवा किनाऱ्यालगत पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस जिल्ह्याच्या किनारपट्टीसह उर्वरित भागात जोरदार पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याचे चित्र आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आज पहाटेपासून जिल्ह्यात जाणवत आहे. काही भागात मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहत होता. जिल्ह्याच्या अन्य भागात देखील वाऱ्याचा वेग वाढला आहे. पावसाच्या सरींवर सरी कोसळत असून, जिल्ह्यातील वातावरण बदलून गेले आहे. पावसाने जिल्ह्यात नुकसानसत्र वाढले आहे. दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात तीव्रता जास्त आहे. बांदा परिसरात वादळी वाऱ्याच्या तडाख्याने ठिकठिकाणी झाडे पडून मोठी हानी झाली. हवामान विभागाने जिल्ह्यात आज (रविवार) रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
www.konkantoday.com