रत्नागिरीतील राष्ट्रवादीही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; सेनेला आघाडी नको असल्यास निवडणुका स्वबळावर लढणार

रत्नागिरी : राज्यातील सत्ताबदलानंतर रत्नागिरीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे. तशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये रत्नागिरीत आम्ही मूळ शिवसेनेच्या सोबत जाणार आहोत. शिवसेनेला जर आघाडी नको असेल तर स्थानिक पातळीवर आम्ही रत्नागिरी नगर पालिकेत 32 जागा लढवण्याची तयारी ठेवली असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुझा यांनी व्यक्‍त केली. वरिष्ठ नेत्यांकडून ज्या पध्दतीने आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही भविष्यात पुढे जाणार आहोत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष नीलेश भोसले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामभाऊ गराटे आदी उपस्थित
होते. राज्यात महाविकास आघाडी असल्याने, स्थानिक नगर पालिका, जि. प. व पंचायत समित्यांमध्ये एकत्र लढण्याची तयारी ठेवलेली आहे.  रत्नागिरी नगर पालिकेत राष्ट्रवादीतून निवडून येऊन दुसर्‍या पक्षात गेलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. या नगरसेवकांना राष्ट्रवादीत यायचे असल्यास त्यांना पाच वर्ष पक्षासाठी काम करावे लागेल मग त्यांचा विचार केला जाईल असेही मुर्तुझा यांनी स्पष्ट केले. निवडणुका पावसाळ्यानंतर होणार असल्याने आता, रस्त्याची परिस्थिती नागरिकांच्या लक्षात येईल असेही बशीर मुर्तुझा यांनी सांगितले. याबाबत वेळोवेळी राष्ट्रवादीचे मिलिंद कीर व सहकार्‍यांनी आवाज उठवला असल्याचेही ते म्हणाले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात काही महिन्यांपूर्वीच जवळपास अडीचशे कोटीहून अधिकचा निधी तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी दिला आहे. कोणत्याही पक्षाच्या आमदारांना अजितदादांनी नाराज केले नव्हते. आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button