गणेशोत्सव काळात परशुराम घाट वाहतुकीसाठी पूर्णवेळ खुला करण्याची मागणी

चिपळूण : पावसाच्या हंगामात गेले अडीच महिने धोकादायक म्हणून वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेला परशुराम घाट पूर्णवेळ वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून सुरू झाली आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी वाहतुकीचा एकमेव मार्ग असलेला घाट पुरेशी खबरदारी व योग्य काळजी घेऊन सुरू ठेवावा, अशी मागणी वाहनचालकांतून सुरू झाली आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध वादग्रस्त कारणांनी रखडले आहे. घाटाचे काम मध्यंतरात सुरू होते. मात्र, काही दुर्दैवी अपघातांमुळे कामाची गती मंदावली. त्यातच गतवर्षीच्या पावसाळी हंगामात घाटात दरड कोसळून दरीकडील बाजूस असलेल्या नागरी वस्तीला धोका निर्माण झाला. या बाबी लक्षात घेता यंदाच्या पावसाळी हंगामात सुरक्षेच्या उपाययोजना करून घाटात वाहतूक सुरू ठेवण्याबाबत नियोजन करण्यात आले. परंतु पावसाच्या सुरुवातीलाच घाटातील दरडी रस्त्यावर येऊन वाहतूक धोकादायक बनली. अखेर प्रशासनाने काही काळ या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाकडे वळविली. मात्र, पर्यायी मार्ग वाहतुकीस त्या मानाने सुरक्षित नसल्याने अवजड व मोठी वाहने पर्यायी मार्गावर खोळंबून राहू लागली. त्यामुळे परशुराम घाटातून चिपळूणकडे येण्यासाठी लागणार्‍या दहा मिनिटांच्या वेळेत पर्यायी मार्गावरून सुरू झालेल्या वाहतुकीला तासभराने वाढला.
मध्यंतरात चिपळूण परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली. दरम्यान, बंद असलेल्या घाटामध्ये त्या मानाने दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या नाहीत. ही बाब लक्षात घेता प्रशासनाकडून घाटातील वाहतूक सकाळच्या वेळेत सुरू ठेवली आहे. मात्र, सायंकाळी 7 वाजल्यानंतर वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन आजपर्यंत कायम असल्याने अनेक वाहनचालक व परशुराम नजिकची गावे, लोटे परिसरातील वाहनचालक, नागरिकांना सायंकाळी सातनंतर कमी वेळेत आपापल्या घरी परतणे त्रासदायक होऊ लागले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button