
‘खेलो इंडिया’साठी रत्नागिरी जिल्ह्यात बॅडमिंटनचे प्रशिक्षण
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयांतर्गत खेलो इंडिया योजनेतून देशातील विविध जिल्ह्यांमध्ये 1000 खेलो इंडिया केंद्र पुढील चार वर्षात निर्माण करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बॅडमिंटन या खेळाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याकरिता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी खेळाडुंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्राकरीता 12 वर्ष खालील वयोगटाकरीता जिल्ह्यातील 15 मुले व 15 मुलींची निवड करण्यात येणार आहे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मारुती मंदिर रत्नागिरी येथे सकाळ व सायंकाळ सत्रात सुरु राहणार आहे. निवड झाल्यानंतर या प्रशिक्षणास नियमित उपस्थित राहणे बंधनकारक राहणार
आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.