
बंदीच्या काळातही खवय्यांना सर्व प्रकारचे मासे मिळणार
माशांच्या प्रजनन कालावधीमुळे समुद्रातील मासेमारी दरवर्षी 31 जुलैपर्यंत बंद ठेवली जाते. या काळात माशांवर ताव मारणार्या खवय्यांची मोठी पंचाईत होते.हे लक्षात घेवून मुंबईतील मासळी व्यावसायिकांनी यावर्षी 100 टन मासे गोठवून ठेवले आहेत. यापैकी मंगळवार आणि गुरुवार वगळता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये सुमारे 4 ते 5 टन मासे विक्रीसाठी येत आहेत. येथून ते राज्यभरात पाठवले जातात.
1 जून ते 31जुलै या काळात मासेमारीसाठी एकही बोट समुद्रात जात नसल्यामुळे जूनअखेर येणार्या विविध प्रकारच्या माशांची व्यापारी फ्रोझनमध्ये (वातानुकूलित गोदाम) साठवणूक करतात. नवी मुंबई लगतच्या तळोजा येथे अशाप्रकारची गोदामे आहेत. तर रत्नागिरी, गुजरात आणि हावडा येथे प्रत्येकी 1 गोदाम आहेत. पापलेट, हलवा, कोळंबी, सुरमई, बांगडा, रावस, वाम, दाताळ, फळई, कोती, घोळ इत्यादी माशांची येथे साठवणूक केली आहे. येथील मासे किमान आठ महिने ताजे राहतात, असा दावा महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी केला आहे.
www.konkantoday.com