
रत्नागिरी शहरात प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई; सुमारे 15 हजार रुपयांचा दंड वसूल
रत्नागिरी : जिल्हाधिकार्यांनी प्लास्टिक पिशव्यांसंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रत्नागिरी शहरातही गेल्या बुधवारपासून कारवाई सुरु झाली आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेचे 8 जणांचे पथक या प्रकरणी कारवाई करत आहे. गेल्या दोन दिवसात प्लास्टिकच्या पिशव्या ठेवणार्या दुकानदारांकडून सुमारे 15 हजार रु. दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मिळालेल्या प्लास्टिकच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. पावसाळ्यात अशा पिशव्या नाले, गटारांमध्ये अडकून पडतात. त्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यांवर, वस्त्यांमध्ये घुसते. जिल्हाधिकारी यांनी प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आरोग्य विभागाचे अधिकारी अविनाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु झाली आहे. शहरातील दुकानदार, फुल-फळभाजी विक्रते, वडापावच्या गाड्या यांची तपासणी सुरू झाली आहे.