रत्नागिरीत तीन ठिकाणी फुटल्या जलवाहिन्या
रत्नागिरी : शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तीन ठिकाणी एकाच वेळी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. आधीच शहराला पाणी टंचाईची झळ बसून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नगर पालिकेच्या गलथानपणाचा फटका बसला आहे. शहरातील साळवीस्टॉप येथून पेठकिल्ला येथील टाकीमध्ये अद्यापही जुन्याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. मंगळवारी रात्री टाकीत पाणी सोडण्यात आल्यावर पाण्याच्या दाबाने बँक ऑफ इंडिया मारुती मंदिर शाखा, समाजनेते स्व. शामराव पेजे पुतळ्यासमोर व जिल्हा परिषदसमोर अशा तीन ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. बुधवारी दिवसभर नगर पालिका कर्मचारी पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी दुरुस्ती करीत होते. या कामासाठी दोन दिवस लागणार असल्याचे नगर पालिका पाणी विभागाचे कर्मचारी श्री. भोईर यांनी सांगितले.