लग्नाच्या गडबडीत दुचाकीस्वारांचा अपघात; सौंदळ येथील दोघे जागीच ठार

राजापूर : जेवणाच्या पंगतीसाठी वापरण्यात येणार्‍या टेबलवर अंथरण्यासाठी कापड आणायला गेलेल्या सौंदळ येथील दोघांचा अपघातात मृत्यू झाला. येळवण आणि खडीकोळवण दरम्यानच्या खिंडीत दुचाकी तसेच मॅक्झिमो या वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. यातील मृतांची नावे रसिराज मुश्ताक नाईक (वय 22) आणि महन्मदसाहेब अल्लीसाहेब मापारी (वय 50) अशी आहेत. सौंदळ मुस्लिमवाडी येथे लग्न समारंभ होता. जेवणाच्या पंगतीसाठी वापरण्यात येणार्‍या टेबलवर अंथरण्यासाठी कापड कमी पडत असल्याने ते आणण्यासाठी दोघेही दुचाकीवरून पाचलला गेले होते.  कापड घेऊन ते सौंदळला निघाले असता दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ते येळवण-खडीकोळवण या दरम्यान खिंडीत आले असता अचानक समोरून  आलेल्या मॅक्झीमो गाडीसोबत (क्र. एमएच 04 एक्स एल 6155 ) अपघात झाला. मॅक्झीमो गाडीचा चालक फरार झाला. रायपाटण पोलिस  दूरक्षेत्रासह राजापूर पोलिस ठाण्यात अपघाताची खबर देण्यात आली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button