
शुद्ध पाणी मिळावे यासाठी पोलिसांनी उभी केली मिनरल वॉटर यंत्रणा
रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालय येथील पोलीस वसाहतीत काही महिन्यांपूर्वी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी निर्माण होत होत्या. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पुढाकार घेत कोल्हापूर येथील मिनरल वॉटरच्या एका एंटरप्रायझेसशी संपर्क साधून नवीन यंत्रणा उभी केली. पाण्यातील आयर्न, मिनरल प्रमाण कमी जास्त होणार नाही. या दृष्टीने ही संपूर्ण यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, पोलीस उपअधिक्षक आयुब खान, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, कोल्हापूर एंटरप्रायझेसचे चावरे व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मिनरल वॉटरसाठी १०० रुपयांचे एटीएम कार्ड येथे उपलब्ध असून ५ रुपयात २० लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. तर थंड पाणी १५ रुपये १८ लिटरने उपलब्ध होणार आहे. १ रुपयाचा क्वॉईन टाकून १ लिटर पाणी तर ५ रुपयाचा क्वॉईन टाकून २० लिटर पाणी कार्डधारकांसाठी उपलब्ध होणार आहे. तर कार्ड नसेल तर ५ रुपयांचे नवीन २ लीटर पाणी आणि १ रुपयाच्या नवीन क्वॉईनने २०० एमएल पाणी उपलब्ध होईल. हा उपक्रम केवळ पोलिसांसाठी नाही तर समाजातील सर्व नागरिकांसाठी असणार आहे. त्यामुळे या स्वच्छ पाण्याचा लाभ इतर नागरिकांनीही घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे.
www.konkantoday.com




