
स्मार्ट विद्युत मीटरचा वापर वाढवल्यास ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार : महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल
मुंबई : वीज वितरण कंपन्यांनी स्मार्ट मीटरचा वापर वाढवल्यास ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार असून यामुळे ग्राहकांच्या वेळेत रिडींग घेणे, योग्य वीजबिल मिळणे या बाबतच्या तक्रारींना वाव राहणार नाही, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी केले.
कॉन्फिड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री(सीआयआय) यांच्यामार्फत आयोजित स्मार्ट मीटर या विषयावरील ऑनलाईनद्वारे झालेल्या परिषदेत श्री.सिंघल बोलत होते. पूर्ण देशभरात ‘स्मार्ट मीटर नॅशनल प्रोग्राम’ अंतर्गत वर्ष २०२३ पर्यंत २५ कोटी पारंपरिक मीटर बदलून त्याजागी स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व त्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी सीआयआयमार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सीआयआय ही संस्था पर्यावरण संवर्धनातून विकास याकरिता भारतात काम करते. या परिषदेत सीआयआय नॅशनल कमिटीचे सह अध्यक्ष डॉ. प्रवीर सिन्हा, आंध्रप्रदेशचे ऊर्जा सचिव श्रीकांत नागुलापल्ली, आसामचे प्रधान सचिव नीरज वर्मा, पंजाबचे प्रधान सचिव(ऊर्जा) वेणू प्रसाद, इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली.चे अध्यक्ष अनिल रावल, सेक्युअर मीटर लि.चे सुकेत सिंघल यांनीही आपला सहभाग नोंदवला होता.
www.konkantoday.com