
जागा दिली वितभर, रिलायन्सने पसारा केला हातभर
रत्नागिरी शहरासाठी महानेट प्रकल्पांतर्गत मंजुर ठिकाणांपेक्षा अनेक ठिकाणी केली रिलायन्स कंपनीने केली पोलची उभारणी
(आनंद पेडणेकर)
शासनाने शहरी भागात महानेट योजनेला मंजुरी दिली असल्याने रत्नागिरी शहरात शासकीय कार्यालयांना इंटरनेट पुरविण्याचे काम करण्यासाठी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीची निवडणूक केली. त्याबाबत ३.२.२०२० च्या एका पत्राद्वारे त्यावेळचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी प्रशासकीय आदेश काढला असून त्यामध्ये शहरातील ३५ कार्यालयांना महानेट प्रकल्पांतर्गत इंटरनेट केबल सुविधा जोडणेसाठी मंजुरी दिली होती. हा प्रकल्प उभा राहण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गाच्या हक्कावर कोणतेही शुल्क आकारू नये अशीही अट घालण्यात आली असून याशिवाय शासकीय कार्यालयांना ब्रॉण्डबँड सुविधा पुरविण्यासाठी ऑप्टीकल फायबर केबल प्रणाली जोडण्यात येणार असल्याने या प्रकल्पासाठी स्मार्ट पोल उभे करण्याकरिता स्थानिक संस्था, सार्वजनिक आरोग्य रूग्णालये, महाविद्यालये तसेच सर्व सरकारी इमारतीत प्रवेश करण्यासाठी लागणार्या मार्गाच्या हक्काकरिता कंपनीला कोणत्याही स्थानिक संस्थेची परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे या आदेशात म्हटले होते. या प्रकल्पाचे काम करीत असताना झालेले खोदकाम पूर्ववत करण्यात येणे आवश्यक होते. अन्यथा या सदर कंपनीकडून मोबदला वसूल करण्यात येणार होता. शासनाच्या या निर्णयाप्रमाणे रत्नागिरी शहरातील ३५ सरकारी कार्यालये जोडण्यासाठी जीओ कंपनीच्यावतीने महानेटचे पोल उभारण्याचे काम शहरात सुरू झाले परंतु कंपनीने शासनाने मंजूर केलेल्या प्लॅनपेक्षा अनेक ठिकाणी अवास्तव पोल उभे होत असल्याचे दिसून येत आहे.
या योजनेला शासनाकडूनच मंजुरी असल्याने नगरपालिकेच्या परवानगीची कोणतीही गरज नसल्याने कंपनीने अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला या पोलची उभारणी केली. मात्र ज्या ठिकाणी सरकारी कार्यालये नाहीत अथवा या यादीतील सरकारी कार्यालयांची नावे नाहीत अशा ठिकाणी उदा. सन्मित्रनगर, ओसवालनगर, राजापूरकॉलनी, आठवडा बाजार आदी ठिकाणी शहरात हे पोल उभारले गेले आहेत.
याबाबत हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित खात्याकडून आता उभारण्यात आलेल्या पोलचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनीने आपल्या फायद्याकरिता अन्य ठिकाणी उभारण्यात आलेले पोलची उभारणी म्हणजे दिलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासारखे आहे असे मत व्यक्त केले जात आहे. www.konkantoday.com
