श्री. नारायणराव राणे यांच्या रूपाने कोकणचा खऱ्या अर्थाने विकास होणार- बाळासाहेब माने

रत्नागिरी : केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागल्यामुळे कोकणचे भाजप नेते, खासदार नारायण राणे यांचे अभिनंदन रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी थेट दिल्ली येथील अकबर रोडवरील श्री. राणे यांच्या निवासस्थानी जाऊन केले. श्री. राणे यांना मंत्रीपद मिळाल्याने कोकणात भाजपची ताकद दुप्पटीने वाढणार आहे, असा विश्वास श्री. माने यांनी व्यक्त केला. कोकणला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे, त्यामुळे आनंद होत असल्याची प्रतिक्रिया श्री. माने यांनी या वेळी दिली.

दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्रीमंडळात श्री. राणे यांना संधी मिळणार अशी बातमी येत होती. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी श्री. राणे यांच्यावर विश्वास दाखवत कोकणला संधी दिली आहे.

श्री. राणे दिल्लीला बैठकीसाठी रवाना झाले. आज त्यांचा शपथविधी होणार असल्याने श्री. माने यांनी थेट नवी दिल्ली येथे जाऊन नारायण राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. या वेळी मिहिर माने, सिंधुदुर्गचे राजन तेली, तसेच सौ. नीलमताई राणे व राणे कुटुंबीय उपस्थित होते.

श्री. माने म्हणाले की, नारायण राणे कुटुंबियांशी आमचे अनेक वर्षे ऋणानुबंध आहेत. रत्नागिरीत विमानतळ येथे माझ्या दि यश फाउंडेशनतर्फे नर्सिंग कॉलेजला भूखंड मिळणे, ही प्रक्रिया फक्त नारायण राणे यांच्या पत्रामुळे सहज शक्य झाली होती. कोकणचे खरे नेते नारायण राणेच आहेत. कोकणाला व नर्सिंग क्षेत्राला श्री. राणे यांच्या रूपाने राजाश्रय मिळेल. आता कोकणचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी आम्हाला नेता मिळाला आहे. त्यांच्या रूपाने नक्कीच कोकणचे प्रश्न सुटतील आणि भाजपची ताकदही दुप्पटीने वाढेल असा विश्वासही बाळ माने यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button